विधान परिषदेसाठीचे दुपारी पावणेचार वाजेपर्यंत 285 आमदारांचे मतदान पूर्ण; 5 वाजता मतमोजणी सुरू होणार
राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेचा निकाल काय येतो याची आतुरता सर्वाना लागली आहे. विधान परिषदेसाठीचे दुपारी पावणेचार वाजेपर्यंत 285 आमदारांचे मतदान पूर्ण झाले असून 5 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत झालेल्या दगाफटक्यानंतर महाविकास आघाडी सावध झाली आहे. तर भाजपने देखील या निवडणुकीतही चमत्कार करून दाखवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आला आहे. त्यांच्या मतदानावेळी दोन सहकारी उपस्थित होते, असा आरोप करत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
न्यायालयाने मलिक, देशमुखांना मतदानाची परवानगी नाकारली
महाविकास आघाडीतील बिनखात्याचे मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना विधान परिषद निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी परवानगी नाकारली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीलाही मोठा फटका बसला आहे. मलिक आणि देशमुख यांच्या मतदान सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मतदान करण्यासाठी मुभा द्यावी, अशी मागणी मलिक, देशमुखांच्या वकिलांतर्फे न्यायालयात करण्यात आली होती पण न्यायालयाच्या निर्णयाने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
काँग्रेस-भाजपात लढत
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान झाले आहे. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता भाजपने याही निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला धक्का द्यायची रणनीती आखली आहे. दहाव्या जागेसाठी काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात लढत आहे. त्यामुळे विधानपरिषदेची खरी लढत ही काँग्रेस आणि भाजपमध्येच असल्याचे दिसून येत आहे.
भाजपकडे मतं नाहीत
भाजपचे 4 उमेदवार कटाकटीने निवडूण येतील. मात्र, पाचव्या जागेसाठी भाजपचे एकही मत शिल्लक नसताना भाजप हा चमत्कार कसा घडवून आणणार? हे पाहावे लागणार आहे. कॉंग्रेसच्या भाई जगताप यांच्याविरुद्ध भाजपने प्रसाद लाड यांनी उमेदवारी दिली आहे. छोटे पक्ष आणि अपक्ष मिळून 29 आमदार आहे. या सर्वांनी मतदान भाजपला केले तर निवडणूक भाजपसाठी सोपी होईल. मविआच्या संपर्कात सुद्धा यातले काही आमदार आहेत.
मविआची प्रतिष्ठा पणाला
भाजपचे 5 आणि महाविकास आघाडीचे 6 असे 11 उमेदवार रिंगणात असून सत्ताधारी आघाडीची प्रतिष्ठा पुन्हा एकदा पणाला लागली आहे. राज्यसभा निवडणुकीतील पराभवानंतर होणाऱ्या या निवडणुकीत आघाडीला पुन्हा अपयश आल्यास तीन पक्षांच्या बनलेल्या राज्य सरकारच्या स्थैर्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. शिवसेनेकडे अतिरिक्त 10 मते आहेत. ती आपल्या दुसऱ्या उमेदवारास मिळावीत, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
मविआकडे 170 संख्याबळ
आघाडीच्या संयुक्त रणनीतीवर विचार करण्यासाठी रात्री निवडक नेत्यांची ट्रायडंटमध्ये बैठक झाली. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. आघाडीकडे 170 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे सहा उमेदवारांपैकी प्रत्येकास 28 मतांचा कोटा निश्चित करण्यात आल्याचे समजते. भाजपनेही कोटा ठरवल्याचे समजते.
एकूण आमदार 285, मतांचा कोटा : 26
10 जागांसाठी 11 उमेदवार
इतर : 29 मते = अपक्ष 13, छोटे पक्ष 16
अपात्र : 3 मते = 1 निधन, 2 आमदार तुरुंगात
शिवसेना 55 मते : 7 अपक्षांचा पाठिंबा : 2 जागा, 10 मते जास्त
राष्ट्रवादी 51 मते : 2 जागा, 3 मतांची गरज
काँग्रेस 44 मते : 2 जागा, 8 मतांची गरज
भाजप 106 मते : 5 जागा, 29 मतांची गरज