मुंबई – राज्यात सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू असतानाच मंगळवारी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. यानंतरही सत्ता स्थापनेचे प्रयत्न सुरूच आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने बुधवारी किमान समान कार्यक्रमावर एक समिती नेमली. यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे 5-5 सदस्य नेमण्यात आले. या समितीमध्ये सामिल असलेल्या काँग्रेस नेत्यांनी संजय राउत यांची रुग्णालयात जाऊन भेट देखील घेतली. यानंतर काही वेळातच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर बाहेर पडत असताना महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार आणि लवकरच सरकार स्थापित होईल असे दावा राउत यांनी केला आहे.
किमान समान कार्यक्रमात काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार यांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादीकडून या समितीमध्ये जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांना सामिल करण्यात आले आहे. या समितीने शेतकऱ्यांचा मुद्दा आणि कर्जमाफी केंद्रस्थानी ठेवण्याचा निर्णय घेतला. यानंतर काँग्रेस नेत्यांनी ट्रायडेंट हॉटेल येथे जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदारांची भेट घेतली. आजपासून चर्चेला सुरुवात झाली याशिवाय उद्धव यांनी माध्यमांशी काहीही बोलण्यास नकार दिला.
उद्धव ठाकरेंसोबत केवळ सदिच्छा भेट -काँग्रेस
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शिवसेना पक्ष प्रमुखांसोबत झालेली भेट ही सदिच्छा भेट होती असे सांगितले आहे. हॉटेल ट्रायडेंटमध्ये झालेल्या भेटीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आधी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते एकमेकांशी सविस्तर चर्चा करतील. त्यानंतर आवश्यकता वाटल्यास आणखी एकदा उद्धव यांच्याशी चर्चा केली जाईल असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.