नवी दिल्ली- निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर भाजप-शिवसेनेत सत्तावाटपावरुन तुतू-मैमै सुरू आहे. या सर्वात काँग्रेस-राष्ट्रवादीची काय भूमिका असणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. निकालानंतर राष्ट्रवादीकडून विरोधी बाकावर बसण्याची भाषा बोलली गेली, तर काँग्रेसकडून सेनेला साथ देणार असल्याच्याही चर्चा रंगू लागल्या. यातच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह काही नेत्यांनी दिल्लीत पक्षाचे जेष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेतली आहे.
आजच शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी स्वबळावर सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. सहाजिकच त्यासाठी शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची गरज लागेल. कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस शिवसेनेला साथ देणार का? हा महत्वाचा मुद्दा आहे.
बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार आणि माणिकराव ठाकरे हे काँग्रेस नेते सोनिया गांधीच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. राज्यातील काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी कोणाची निवड करायची यावरही चर्चा होईल. काँग्रेसला यंदा ४४ जागा मिळाल्या आहेत.
काँग्रेस पक्ष हा सेक्युलर पक्ष आहे सर्वधर्मसमभाव मानणारा पक्ष आहे. काँग्रेसने शिवसेनेसोबत मुळीच जाऊ नये अशी भूमिका सुशीलकुमार शिंदे यांनी घेतली आहे. सुशीलकुमाऱ शिंदे हे माजी केंद्रीय मंत्री आहेत. त्यांनी काँग्रेसने शिवसेनेसोबत जाण्याच्या भूमिकेला कडाडून विरोध दर्शवला आहे. जनमत मान्य करुन काँग्रेसने विरोधात बसावं असंही त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस हा सेक्युलर पक्ष आहे काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि शिवसेनेची विचारधारा या दोहोंमध्ये खूप फरक आहे. त्यामुळे काँग्रेसने शिवसेनेसोबत जाऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे असं शिंदे यांनी म्हटलं आहे.
वेणुगोपाल यांच्यासोबतच्या भेटीबद्दल बाळासाहेब थोरातांनी म्हणाले की, “या भेटीत आम्ही त्यांना महाराष्ट्राच्या परिस्थितीविषयी आणि विधानसभा निवडणुकीतील आमच्या कामाविषयी माहिती दिली. सोनिया गांधी यांच्या सुचनेनुसार आम्ही वेणुगोपाल यांची भेट घेतली. आम्हाला विस्तृत चर्चा करायची असल्याने सोनिया गांधी यांनी आम्हाला वेणुगोपाल यांच्याशी चर्चा करण्यास सांगितले.” तसेच, राज्यातील परिस्थितीवर आमची नजर आहे आणि सध्या “वेट अँड वॉच” ही परिस्थिती असल्याचं देखील थोरात यांनी यावेळी नमूद केलं.
या बैठकीत माणिकराव ठाकरे देखील उपस्थित होते. ते म्हणाले की, “आज महाराष्ट्रात जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याला पूर्णपणे भाजप जबाबदार आहे. सध्या आमचे काहीही ठरलेले नाहीये. आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा जनाधार मिळालेला आहे. त्यामुळे सध्या काँग्रेसचा मुख्यमंत्री होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही”, असे ते म्हणाले.