सातारा – भाजपच्या महाजनादेश यात्रेचे साताऱ्यात दुपारी आगमन झाले. त्यानंतर भव्य सभा भरवण्यात आली होती. यात नुकतंच भाजपात आलेले उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपाच्या व्यासपीठावर हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करतांना सर्वप्रथम शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांना तलवार भेट दिली तर उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांना पारंपारिक राजेशाही पगडी घालून त्यांचे स्वागत केले. यावेळी भाषण करताना उदयनराजेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर आपली तोफ दागली. सत्ता असताना आमच्या मागण्यांकडे कायमच दुर्लक्षच करण्यात आले. आमच्या सर्व फायल्स थेट डस्टबीनमध्ये जायच्या असा आरोप त्यांनी केला. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपल्या अवस्थेविषयी आत्मचिंतन करायला हवे असे ते म्हणाले.
‘कामं मार्गी लावणारी माणसं’
उदयनराजे भोसले यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षावर केला. उदयनराजे भोसले म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील ही कामं मार्गी लावणारी माणसं आहेत. त्यामुळं कामं करणाऱ्या माणसांसोबत आपण राहिलं पाहिजे. या हेतूने मी भाजपमध्ये दाखल झालो. आधीच्या सरकारमध्ये घोंगडं भिजत ठेवण्याची प्रवृत्ती होती. आपल्या जिल्ह्याचे एक सुपूत्र (पृथ्वीराज चव्हाण) मुख्यमंत्री होते. पण, साताऱ्याचा विकास काही झाला नाही. तेही मुख्यमंत्री होते आणि हेही मुख्यमंत्री आहेत. पण, कामं यांनीच मार्गी लावली.’
राष्ट्रवादी सरकार असताना लोकांच्या हिताचं काम झाल नाही
गेली 15 वर्षे मी त्यांच्यासोबत होतो. विचार केल्यानंतर कळालं की, एक तरी लोकांच्या हिताचं काम काँग्रेस एनसीपीच्या सरकार असताना झालं का? आम्ही मागण्या घेऊन जायचो तर आमच्या नावासमोर फुलीच होती. आमची फाइल जायची ती थेट डस्टबीनमध्ये जायची. असे अनेक वर्षे गेले. खरं पाहता त्यांनी आमचे कधीच काम नाही केलं. तर निदान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला काही नाही तर एक सहनशीलतेचा पुरस्कार तरी द्यायला हवा होता, मात्र तेही माझ्या नशीबी नव्हतं असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला, असा मिश्किल टोलाही त्यांनी लगावला.
पुढे ते म्हणाले, मी कामे करायचा प्रयत्न केला, पण कामाच्या बाबतीत मी जेव्हा जायचो तेव्हा माझ्या पदरी निराशाच पडली. जी कामे झाली ती रेटून केली म्हणून झाली. सत्तेत असताना एकाही रुपयाचं काम झालं नाही. काम करण्यासाठी मला भांडावं लागल. ही लोकशाहीची पद्धत नाही, मात्र तेव्हा माझ्याकडे पर्याय नव्हता. नंतर भाजप सरकार आल्यापासून अनेक कामे झाली. जवळपास 15 हजार कोटींची कामे झाली आहेत.
ईव्हीएमवर राजेंचा यु-टर्न
काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये असताना उदयनराजेंनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी भाजप शिवसेना सरकावर प्रश्न उपस्थित केले होते. आता त्यांनी यावरही भाष्य केले आहे. ईव्हीएमवर मलाही संशय होता, एवढे मतदान या पक्षाला कसकाय मिळते, असा प्रश्न मलाही पडला होता. नंतर मी विचार की, देवेंद्रजींनी आतापर्यंत अनेक कामे केली आहेत, सर्व कामे मार्गी लावली. यामुळेच लोक त्यांचे काम पाहून मतदान करतात. लोकं नाव ठेऊ दे की, काहीही करो. मला ठाम विश्वास आहे की, ही सर्व सर्व कामाला लावणारी लोक नाही. तर कामं मार्गी लावणारी लोक आहेत. असे म्हणत, राजेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीकांचा भडीमार केला तर भाजपची स्तुतीसुमनेही गायली.
उदयनराजेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
> एक-दोन नाही, तर 15 वर्षांनंतर असा निर्णय मी का घेतला ? याचा विचार टीकाकरांनी करावा.
> 15 वर्षे आमच्या नावावर फुली होती; आमची फाईल डस्टबिनमध्ये टाकली जात होती. इतकं सहन केलं. त्यासाठी किमान राष्ट्रवादीनं मला शहनशीलतेचा तरी पुरस्कार द्यायला हवा होता.
> जी काम केली ती रेटून केली म्हणून झाली. सत्तेत असताना 1 रुपयांच काम झालं नाही.
> नळावर भांडण असतं तसं भांडाव लागलं.
> विरोधी खासदार असताना देखील युतीच्या काळात भाजपने साताऱ्यामध्ये 680 कोटी रुपयांची काम केली. 15 हजार कोटीची रेल्वेची कामे केली.
> मी विचार केला, यांनी 15 वर्षात केलं नाही मग आत्ता काय करणार. माझा बँड वाजवण्याचा कार्यक्रम त्यांनी आखला होता. माझा बँड कोणी वाजवू शकत नाही. कारण माझा बँड फक्त मीच वाजवतो. कारण मीच बँड मास्टर आहे.
> कृष्णा खोरे प्रकल्प हा काँग्रेस आणि त्याच्या मित्र पक्षाने राबवायला हवा होता. कृष्णा खोरेचे काम 2006 सालीच व्हायला हवं होतं. पण अद्याप ती कामं झालेली नाही.