मुंबई -आज उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर राजीनामा येणे अपेक्षितच होते. पण, मला वाटतं की हा राजीनामा देण्यासाठी उशीर झाला. आमची अपेक्षा अशी होती, की इतके गंभीर आरोप लागल्यानंतर आणि रश्मी शुक्लांचा रिपोर्ट बाहेर आल्यानंतर तत्काळ अनिल देशमुख यांचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने व शरद पवार यांनी घ्यायला हवा होता. परंतु आता त्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी लागली.’
मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया यायला हवी होती
‘राजीनामा जरी आला असला तरी एका गोष्टींचे कोडे मला पडले आहे. इतक्या भयावह घटना, महाराष्ट्रात झाल्या. कधी नव्हे अशा प्रकारचे आरोप हे मंत्र्यांपासून ते पोलिसांपर्यंत त्या ठिकाणी लागले. पण राज्याचे मुख्यमंत्री या संदर्भात एक शब्द बोलत नाहीत? अद्याप त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया का दिली नाही ? या संपूर्ण प्रकरणात त्याचे मौन हे अस्वस्थ करणारे आहे. म्हणून मला असं वाटतं की, किमान अशा परिस्थितीत तरी, त्यांची प्रतिक्रिया ही यायला हवी होती. त्यांची शेवटची प्रतिक्रिया जी मला आठवते, ती वाझे काय लादेन आहे का ? ही होती. तो लादेन आहे की दाउद आहे, हे मला माहिती नाही. पण तो नेमका काय आहे हे समोर आल्यानंतर आणि या सर्व घडामोडीनंतरही मुख्यमंत्री का बोलत नाहीत? हा माझा सवाल आहे,’ असे देखील फडणवीस म्हणाले.