मुख्यमंत्री ठाकरेंचे देवेंद्र आणि केंद्रातील भाजपावर जोरदार टीकास्त्र
मुंबई–राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेचा जोरदार समाचार घेतला आहे. फडणवीस यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी “तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे ! येर गबाळ्याचे काय काम!!” या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा उल्लेख केला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी बाबरी मशीद प्रकरणाची भाजपला आठवण करुन दिली.
“भाजपनं आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. तेवढी तुमची पात्रता नाही. ज्या बाळासाहेबांचा उल्लेख तुम्ही करत आहात. त्याचं हिंदुत्व हे काही शेंडी-जानव्याचं हिंदुत्व नव्हतं. बाबरी मशिदी पाडली गेली तेव्हा सर्व ‘येर गबाळे’ पळून गेले होते. एकटे बाळासाहेब आक्रमकपणे उभे राहिले होते. त्यामुळे भाजपनं हिंदुत्वाच्या गप्पा मारू नये. जम्मू-काश्मीरमध्ये युती करताना भाजपचं हिंदुत्व कुठं गेलं होतं?”, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.
बंद दाराआडच्या वचनावरुन मुख्यमंत्री आक्रमक
विधानसभा निवडणुकीआधी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा यांनी बंद दाराआड दिलेल्या वचनाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा आक्रमक झालेले पाहायला मिळाले. “ज्या बाळासाहेबांची आठवण तुम्हाला आता होतेय. ज्या हिंदुत्वावर तुम्ही बोलत आहात. मग ज्या खोलीला आम्ही हिंदुत्वाचं मंदिर मानतो. त्या खोलीत दिलेलं वचन बाहेर आल्यावर तुम्ही निर्लज्जपणे नाकारता. याची लाज वाटायला हवी”, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
मराठी काय भिकारी आहे का?
पुढच्या मराठी भाषा गौरव दिनापर्यंत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याच्या निर्धार बोलून दाखवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारकडून यासंदर्भात सर्व पूर्तता झाली असून केंद्रानेच हा दर्जा दिलेला नाही असा आरोप केला आहे. विधासनभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणासंदर्भात आभार व्यक्त करताना उद्धव यांनी केंद्र सरकारमुळेच मराठीला अद्याप अभिजात भाषेचा दर्जा मिळाल नसल्याचे सांगितले. मराठी काय भिकारी आहे का?, महाराष्ट्र भिकारी आहे का? आम्ही काय कटोरा घेऊन दिल्लीच्या दारात उभे आहोत का?, असे प्रश्न उद्धव यांनी विधानसभेमध्ये आपल्या भाषणादरम्यान उपस्थित केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यापालांचे आभार मानल्यानंतर भाषणामध्ये सर्वात आधी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भातील निर्णय केंद्राने अडकवून ठेवल्याचा आरोप केला. “मुख्यमंत्री म्हणून माझ्या कार्यकाळातील दुसरा मराठी भाषा दिन झाला. त्या मराठी भाषादिनानिमित्त आम्ही म्हणत असतो की मराठी भाषेला आम्ही अभिजात भाषेचा दर्जा देऊ. आम्ही म्हणजे कोण देणार आहे?, आपल्याकडून ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सर्व देण्यात आल्या आहेत. आणखीन काही लागल्या तर त्याही देऊ. मात्र अजूनही केंद्राकडून माझ्या या मातृभूमिला तिष्ठत उभं ठेवलं आहे,” असं उद्धव यांनी म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना उद्धव यांनी संतापून,”मराठी भिकारी आहे का? महाराष्ट्र भिकारी आहे का? आम्ही काय कटोरा घेऊन त्या दिल्लीच्या दारामध्ये उभे आहोत? छत्रपतींची भाषा भिकारी असू शकत नाही,” असं म्हणताच सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी बाकं वाजवून त्यांचं समर्थन केलं.
“तुम्ही हिंदुत्व हिंदुत्व म्हणता ते पहिलं हिंदुत्व राज्य स्थापन करणाऱ्या छत्रपतींची ही मातृभाषा आहे. तिच माझी आणि तुमची मातृभाषा आहे. तसेच छत्रपती नसते तर तुमचं आमचं सोडून द्या. दिल्लीत जे बसलेत ते तरी असते का हा पहिला विचार केला पाहिजे आणि ज्या भाषेमुळे आपलं अस्तीत्व आहे, त्या भाषेला तुम्ही तिचा मान द्यायला नाकारात आहात हा करंटेपणा महाराष्ट्र कदापी विसरु शकत नाही. मराठी माती आणि मराठी माता हे विसरु शकत नाही,” अशा शब्दांमध्ये उद्धव यांनी केंद्र सरकारमुळेच मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा प्रश्न अडकून आल्याचा आरोप केला.
सुधीर मुनगंटीवार यांच्या भाषणाच्या स्टाईलवरून यावेळी मुख्यमंत्र्यांनी टोमणा मारला. “मी माझ्या केबिनमध्ये बसलो होतो. कामकाज ऐकताना अचानक मला भास झाला की मी नटसम्राट बघतोय. मी अथेल्लो, मी हॅम्लेट…आणि शेवट असा केविलवाणा वाटला की कोणी किंमत देता का किंमत! सुधीरभाऊ काय तुमचा वेश, काय तुमचा आवेश.. देवेंद्रजींना भिती वाटायला लागली की आमचं कसं होणार? कारण ज्या तडफेने तुम्ही बोलत होता, ते छान होतं”, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
शेतकऱ्याच्या मार्गात खिळे अन् चीन दिसले की पळे
दिल्तील शेतकऱ्याच्या मार्गात खिळे अन् चीन दिसले की पळे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. देश ही तुमची खासगी मालमत्ता नाही, महाराष्ट्र तर नाहीच… देश ही शेतकऱ्यांची मालमत्ता आहे. स्वातंत्र्य लढ्यात आम्ही तर नव्हतोच, पण तुमची मातृसत्ताही स्वातंत्र्यलढ्यात नव्हती. त्यामुळे, भारत माता की जय बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही. केवळ भारत माता की जय म्हणून देशप्रेम सिद्ध होत नसतं. येथील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावे लागतात. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आमच्यावर विश्वास आहे, पण आंदोनलासाठी बसलेल्या पंजाबमधील शेतकऱ्यांचा प्रश्न तुम्ही कधी सोडवणार? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विरोधकांना विचारला.
फेसबुक लाईव्हवरील टीकेला उत्तर
मी कोरोना काळात फेसबुक लाईव्ह करतो होतो. या फेसबुक लाईव्हरील फीडबॅकमधून मिळालेल्या माहितीनुसार, याच फेसबुक लाईव्हमुळे महाराष्ट्रातील जनता मला त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य मानायला लागली, हीच माझी आयुष्यातील सर्वात मोठी कमाई आहे. फेसबुक लाईव्हमधून मी महाराष्ट्राच्या जनतेच्या घरात पोहोचलो, नागरिकांना धीर मिळाला, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. तसेच कोरोना काळातील घोटाळा आणि आरोपांवरील टीकेलाही त्यांनी उत्तर दिलं. हा व्हायरस आहे, तो व्हायरस म्हणाला मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन आणि कोरोना व्हायरस पुन्हा आला, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना सभागृहातच टोला लगावला.
“सुधीरभाऊ, माझ्यासारखंच तुमचं झालंय”
यावेळी, “माझं जसं झालंय, तसंच तुमचंही झालंय. कलागुणांना वाव नाही हो या क्षेत्रात. मी फोटोग्राफर आहे. गडकिल्ल्यांची फोटोग्राफी केली. आता बंद आहे. पण कलाकार कुठे थांबून नाही राहात. जिथे संधी मिळेल, तिथे कला उचंबळून येते. पण सुधीरभाऊ, ती मारू नका”, असंही उद्धव ठाकरे सुधीर मुनगंटीवारांना म्हणाले.