कोल्हापूर-महाराष्ट्रातील सत्ता गेल्यामुळेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मानसिक संतुलन ढासळल्यासारखे वक्तव्य करत आहेत, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. त्यामुळेच चंद्रकांत पाटील डोक्यावर परिणाम झाल्यासारखं खुळ्यासारखं बडबडत आहेत, असा उपहासात्मक टोलाही त्यांनी लगावला.
चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेबद्दल मंत्री मुश्रीफ यांनी कोल्हापूरातील आजरा येथे झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या प्रचार मेळाव्यात खरपूस समाचार घेतला मंत्री मुश्रीफ म्हणाले, बहुजनांचे नेतृत्व म्हणून शरद पवार यांनी नवा महाराष्ट्र घडविला. दहा ते बारा लोकसभेच्या व दहा ते बारा विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या. देशाचे कृषी मंत्री, संरक्षण मंत्री या पदांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दिलेले योगदान निश्चितच मोठे आहे. राज्यात आणि केंद्रातही विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी काम केले. तसेच ते एकदाही पराभूत झालेले नाहीत.
ते म्हणाले, चंद्रकांत पाटील यांनी काहीही न करता त्यांना एकदा नव्हे दोनदा केवढी मोठी संधी मिळाली होती. किती भाग्यवान आहेत ते. परंतु या सगळ्याचा राज्याला तर सोडाच कोल्हापूर जिल्ह्यालासुद्धा काहीही उपयोग झालेला नाही.