25 भाजप , 13 शिंदे गटाचे तर 7 अपक्ष आमदारांचा समावेश असू शकेल
मुंबई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गुरूवारी येत्या 3 दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार करणार असल्याचे सूतोवाच केले आहे. महाराष्ट्रातील ‘शिंदे’गट-भाजप आघाडी सरकारला जवळपास एक महिना पूर्ण होत आला आहे. पण अद्याप या सरकारला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त सापडला नाही. या प्रकरणी विरोधकांची चौफेर टीका सुरू असताना त्यांनी हे सुतोवाच केले आहे.
शिंदे म्हणाले -‘या प्रकरणी काहीसा विलंब झाला आहे. पण कोणत्याही पातळीवर कोणताही वाद नाही. आम्ही पुढील 3 दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार करू. सदस्यांच्या निवडीत कोणताही भेदभाव करण्यात आला नाही. त्यामुळे संभाव्य मंत्रिमंडळ खूप चांगले असेल.’
तत्पूर्वी, बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासंबंधी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला जाणार होते. पण शेवटच्या क्षणी त्यांनी आपला दौरा रद्द केला. सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्रिमंडळात जवळपास 45 मंत्री असतील. त्यात 25 भाजपच्या कोट्यातून, 13 शिंदे कोट्यातून तर 7 अपक्ष आमदारांचा समावेश असेल.
मंत्रिमंडळ विस्तार किती टप्प्यात होणार हे ठरणे बाकी
महाराष्ट्रातील भाजप व शिंदे गटाच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार किती टप्प्यंत होईल यावर मुख्यमंत्री व उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात लवकरच चर्चा होणार आहे. शिंदे गटात 40 बंडखोर आमदार आहेत. त्यामुळे 26 आमदारांना एकत्र ठेवणे सोपी गोष्ट नाही. त्यामुळे ज्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही त्यांची विविध महामंडळांवर वर्णी लावण्याचा प्रयत्न केला जाईल.
कॅबिनेट विस्ताराशी संबंधित शक्यता
- कॅबिनेटचा 2 टप्प्यांत विस्तार झाला तर पहिल्या टप्प्यात 19 सदस्यांचा शपथविधी केला जाईल. त्यात 12 भाजपचे तर 7 शिंदे गटाचे मंत्री असतील.
- कॅबिनेटचा एकाच टप्प्यात विस्तार झाला तर त्यात भाजपचे 26 व शिंदे गटाचे 14-15 सदस्य मंत्रीपदी विराजमान होतील.
- दोन्ही पक्षांत कॅबिनेट सदस्यांच्या आकड्यावर मतैक्य नव्हते. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारास उशीर झाला.
मतभेदामुळे उशीर
मंत्रिमंडळ विस्ताराप्रकरणी होणाऱ्या विलंबामुळे शिंदे सरकारला विरोधकांच्या तिखट टीकेचा सामना करावा लागत आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी शिंदे व फडणवीस याच्यावर उपरोधिक टीका केली आहे. ते म्हणाले -‘2 जणांचे सरकार केवळ नावालाच आहे. जनतेच्या समस्यांकडे डोळेझाक केली जात आहे. भाजप व शिंदेगटातील मतभेदांमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे.’
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे विलंब
शिंदे यांच्या घाईघाईने झालेल्या शपथविधीनंतर ते लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करतील, असे मानले जात होते. मात्र, असे काहीच घडले नाही. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टातील प्रलंबित याचिकांमुळे मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब होत असल्याचा आरोप केला जात आहे. शिवसेनेतील उद्धव व शिंदे गटाच्या सत्ता संघर्षावर 20 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. पण कोर्टाने ती 1 ऑगस्टपर्यत लांबणीवर टाकली.
बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने 7 याचिका दाखल केल्या आहेत. तसेच शिंदे गटाच्या पक्ष चिन्ह गोठवण्याच्या मागणीविरोधात निवडणूक आयोगात कॅव्हेटही दाखल करण्यात आले आहे. हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयातही आहे.