पुणे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्रव्यापी महाजनादेश यात्रेचे दोन टप्पे यशस्वी झाले असून शुक्रवार १३ सप्टेंबर ते गुरूवार १९ सप्टेंबर या कालावधीत महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून तिसरा टप्पा प्रारंभ होऊन नाशिक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाजनादेश यात्रेचा समारोप होणार आहे.महाजनादेश यात्रा शनिवारी (ता. १४ सप्टेंबर) संध्याकाळी पाच वाजता पुणे शहरात येणार आहे.
शनिवारी सायंकाळी पाच वाजता येथे हडपसर येथे पुणे शहर भाजपच्या वतीने भव्य स्वागत करण्यात येणार आहे. महाजनादेश यात्रेच्या मार्गावर सुमारे ६० छोट्या मोठ्या चौकात मगरपट्टा, पूलगेट, गोळीबार चौक, सेव्हन लव्हज चौक, स्वारगेट, सारसबाग, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, दत्तवाडी, नळ स्टॉप, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, शेतकी महाविद्यालय चौक, संचेती चौक, आरटीओ, जहांगीर रुग्णालय, तारकेश्वर चौक, येरवडा, नगर रस्ता मार्गे चंदननगर असा यात्रेचा मार्ग आहे. दुसर्या दिवशी सकाळी दहा वाजता दांडेकर पूल येथून यात्रा पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्रव्यापी महाजनादेश यात्रेस पहिल्या व दुस-या टप्प्यात सर्वत्र उस्फूर्त व अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. विशेषतः युवक, महिला, मुस्लिम महिला व ग्रामीण भागात शेतकरी यांचा सहभाग व उपस्थिती लक्षणीय होती. आधीच्या दोन टप्प्यात महाजनादेश यात्रेचा राज्यातील २४ जिल्ह्यातील १०६ विधानसभा मतदारसंघातून २२०८ कि. मी. प्रवास झाला. आपल्या सरकारच्या पाच वर्षाच्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर जाऊन मांडणारे देवेंद्र फडणवीस हे राज्यातील पहिले मुख्यमंत्री आहेत.
महाजनादेश यात्रेचा प्रारंभ अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथून भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंग, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत झाला होता. दुस-या टप्प्यात जालना येथे भारतीय जनता पार्टीचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव उपस्थित होते. महाजनादेश यात्रेच्या दुस-या टप्प्याचा समारोप सोलापूर येथे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस व निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत झाला.
महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा शुक्रवार १३ सप्टेंबर रोजी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून प्रारंभ होईल. तिसऱ्या टप्प्यात ही यात्रा १३ जिल्ह्यातील ६० विधानसभा मतदारसंघातून १,५२८ कि. मी. प्रवास करणार आहे. गुरूवार १९ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष उपस्थितीत नाशिक येथे महासभेने महाजनादेश यात्रेचा समारोप होणार आहे.