मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पक्षाने विधानपरिषदेची उमेदवारी नाकारल्याने ते संतापले आहेत. या संपूर्ण प्रकरणावर केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी भाष्य केलं आहे. एकनाथ खडसे यांच्यावर अशी वेळ येणे दुर्भाग्यपूर्ण असल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. भाजप वाढीसाठी एकनाथ खडसे यांचं काम मोठं आहे. उत्तर महाराष्ट्रात भाजप वाढण्यासाठी त्यांनी मोठे कष्ट घेतले असल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलं.महाराष्ट्रात भाजप पक्षवाढीसाठी एकनाथ खडसे यांनी भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अतिशय प्रतिकुल काळात त्यांनी पक्षाचं काम केलं आणि पक्षाला मोठं यश मिळवून दिलं.
खडसे म्हणाले होते….
स्वतःकडे ज्यावेळस अधिकार येतात तेव्हा संघटनेला विश्वासात न घेता, मी पक्ष चालवतो, अशी भावना निर्माण होते. तेव्हा पक्षाची अशी वाताहत होते. आज भाजपाचं जे चित्र आहे, ते सामूहिक नाही. संघटित नाही. एकमेकांशी चर्चा करून निर्णय घेतले जात नाही. एखाद्यावेळी तर ते देखाव्यापुरते दाखवले जातात, असं खडसे म्हणाले होते.
प्रदेश कार्य समितीच्या बैठकांमध्ये दोन तीन भाषणं होतात, कुणाला बोलू दिलं जात नाही. असे अनेक विषय आहेत. हे पक्षातंर्गत विषय आम्ही वरिष्ठांच्या कानावर घालणार आहोत. अशानं कसा पक्ष वाढेल? इथं बहुजन समाजाच्या नेतृत्वाचं जर खच्चीकरण करत असाल, अशी विचित्र वागणूक जर मिळत असेल, तर पक्षाच्या वरिष्ठांकडे हे मांडण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. पक्षाचा विस्तार होईल, यापेक्षा एखाद्या व्यक्तीचा, व्यक्तिमत्वाचा विकास होईल, अशा स्वरूपाचं वातावरण आज भारतीय जनता पक्षामध्ये आहे. एखाद्या कुठल्यातरी व्यक्तीची हुकुमशाही चालवून घ्यायची आणि त्यांनीच निर्णय घ्यायचे. वरिष्ठांचे आशीर्वाद असल्यामुळे स्वतः सर्वस्वी समजायचं, हे जे भाजपत सुरू आहे. लोकशाही पद्धत आता भाजपात राहिलेली नाही, असंही खडसे म्हणाले होते.
खडसे म्हणाले होते की, वर्षानुवर्ष काम करणाऱ्यांना डावलून तुम्ही अशा पद्धतीनं उपरे अंगावर घेत असाल, जे आम्हाला शिव्या घालतात. जे मोदींना शिव्या घालतात, अशांना घेतल्याचं वाईट वाटतं. विरोधी पक्षात एकटं असताना 123 आमदार निवडून आणले. महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री आणला आणि सत्ता, पैसा सगळं असून 105 आमदार आले. या प्रवृत्तीमुळे 105 आमदार आले. विरोधी पक्षात बसायची वेळही याच कारणामुळे आली. पुढे कष्टानं जावं लागणार आहे, नाहीतर 105 आमदारांचे 50 आमदार व्हायला वेळ लागणार नाही, असा घणाघाती आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता.