मुंबई-भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या पक्षावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांमुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजपमध्ये महिलांचा सन्मान होत नसल्याचा आरोप करत स्वतःचं कर्तृत्त्व सिद्ध करून सुद्धा पक्षाकडून डावललं जातं, अशा शब्दात भाजप आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ‘मंदा म्हात्रे यांचं काय म्हणणे आहे हे आम्ही ऐकून घेऊ.’ चंद्रकांत पाटील आज जालना जिल्हाच्या दौर्यावर असून माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.
मंदा म्हात्रेंनी कोणते आरोप केले?
भाजपमध्ये महिलांच्या सन्मानावरुन मंदा म्हात्रे यांनी भाजप पक्षावर अनेक आरोप केले. त्या म्हणाल्या की, राजकारणात येण्यासाठी महिलांना प्रचंड संघर्ष करावा लागतो. मी पहिल्या वेळी निवडून आले तेव्हा मोदींची लाट होती म्हटलं गेलं. परंतु, मी दुसऱ्यांदा देखील निवडून आले. यावेळी मोदी यांची लाट नव्हती. मी माझ्या कर्तृत्वावर निवडून आले. परंतु, महिलांनी केलेलं कोणतेही काम बाजूला करायचं असा गंभीर आरोप म्हात्रे यांनी यावेळी केला.