रत्नागिरी- कोकणातील बहुचर्चित नाणार रिफायनरी प्रकल्पावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे. शिवसेना आणि ग्रामस्थांच्या विरोधानंतर हा प्रकल्प दुसरीकडे हलवण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले होते, पण राजापूरमधील हा उत्साह पाहून प्रकल्प पुन्हा आणावा वाटतोय, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी सुचक विधान केलं आहे.मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सध्या कोकणात आहे. या यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी हे विधान केले. नाणार प्रकल्प कोकणात आणण्यास शिवसेनेचा विरोध असल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या विधानाने शिवसेना आणि भाजपा यांच्यात वाद रंगण्याची चिन्हे आहेत.
नाणारमध्ये येणारा प्रकल्प हा ग्रीन रिफायनरी आहे, ज्यामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. या रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणातील एक लाख बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. ज्या प्रकारे विरोध झाला, त्यामुळे आम्ही हा निर्णय थांबवला. पण हा उत्साह पाहिल्यानंतर आता पुन्हा एकदा चर्चा करावी असे मला वाटते. आज मी कोणताही निर्णय जाहीर करत नसलो तरी पुन्हा एकदा तुम्हाला भेटायला बोलावणार, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
एक लाख रोजगार निर्मिती
आशिया खंडातील सर्वांत मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प कोकणात उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या सीमेवरील नाणारमध्ये उभारण्यात येणार होता, पण विऱाधानंतर हा दुसरीकडे स्थलांतरीत करण्यात आला. या प्रकल्पाच्या माध्यमातून हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या प्रमुख तेल कंपन्या एकत्र येणार आहेत. या प्रकल्पात तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, सुमारे एक लाख रोजगार निर्माण होण्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आला आहे.