नवी दिल्ली – काल राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांना राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी शपथ दिली. यावेळी भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतल्यानंतर, ‘जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी’ अशी घोषणा दिल्याने सभापती व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजे यांना समज दिली होती. मात्र यामुळे महाराष्ट्रासह देशभरातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्याआहेत.
याच पार्श्वभूमीवर व्यंकय्या नायडू यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. याबाबत ट्विट करताना ते लिहतात, ‘मी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रशंसक असून देवी भवानीचा उपासक आहे. परंपरेनुसार शपथ घेताना कोणत्याही घोषणा दिल्या जात नाहीत, याचीच सभासदांना आठवण करून दिली. यात अजिबात अनादर केलेला नाही,’तत्पूर्वी काल, छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ‘जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी’ असा जयघोष केल्यानंतर व्यंकय्या नायडू यांनी त्यांना, ‘सदनातील नवीन सदस्यांना सांगतो की, हे रेकॉर्डवर जाणार नाही, फक्त तुमची शपथ नोंदवली जाणार आहे. सदनात कोणतीही घोषणा देता येणार नाही, हे भविष्यात लक्षात असू द्या’ अशी समज दिली होती.