औरंगाबाद- औरंगाबादची शहराचं नाव संभाजीनगर करण्याची अनेक दिवसांपासूनची मागणी लवकरच पूर्ण होणार आहे.शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी हि माहिती दिली. ”औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्व कागदपत्रे मागवून घेतली आहेत. औरंगाबादच्या जनतेला थोड्याच दिवसात सुखद धक्का मिळणार,” असे खैरे यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले.तर संभाजी महाराज थोर होते ,त्यांचे नाव शहराला जरूर द्या,पण त्या अगोदर शहराचा तसा विकास करून दाखवा आणि नंतर त्यांचे नाव द्या ‘ असा टोला खासदार इम्तियाज जलील यांनी सेना आणि मनसे ला दिला आहे.
खैरै म्हणाले की, “लोकसभा आणि विधानसभेत आम्ही संभाजीनगर म्हणूनच उल्लेख करतो. अटल बिहारी वाजपेयी यांच्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यत सगळ्यांकडे ही मागणी मी लावून धरली होती. विधानसभेतही प्रश्न मांडले होते. चार वेळा तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे प्रश्न उपस्थित केले,” असे खैरे म्हणाले. याशिवाय, “संभाजीनगरच्या मुद्द्यावर महापालिका निवडणूक जिंकू शकतो, असे वाटल्यामुळे मनसेने ही भूमिका उचलून धरली. परंतु सर्वांना माहित आहे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘संभाजीनगर’ नाव ठेवलं होतं. त्यामुळे त्याचं क्रेडीट कोणीही घेऊ नये”, असंही खैरे यावेळी म्हणाले.
औरंगाबादचे नाव बदलले तर काय हरकत आहे? राज ठाकरेंचा सवाल
औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्यात यावे अशी मनसेने उचलून धरली आहे.यापूर्वी ही मागणी शिवसेनेची होती. औरंगाबादचे नाव बदलले तर काय हरकत आहे? असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. चांगले बदल झालेच पाहिजेत. असे म्हणत राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.तसेच आता मनसेने आपल्या पक्षाची भूमिका पूर्णपणे बदलली आहे. मनसे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकारण करत आहे. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मी भूमिका बदलली नाही. घुसखोरांना आणि पाकिस्तानी कलाकारांना माझा पूर्वीपासून विरोध होता. उलट भूमिका बदलून अनेकांनी सत्ता स्थापन केली आहे.
“… तर मी स्वतः औरंगाबादचं नाव संभाजी नगर होण्यासाठी पुढाकार घेईन” -इम्तियाज जलील
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या नामांतराबाबत त्यांची भूमिका मांडली आहे. “मनसे आणि शिवसेना हे दोन पक्ष औरंगाबादचं नामांतर होईल असं म्हणत आहेत. शिवसेनेचे माजी खासदार तर कुठल्याही क्षणी औरंगाबादचं नाव बदलून संभाजी नगर करण्यात येईल असं म्हणत आहेत. मात्र या दोन्ही पक्षांना माझा एक सल्ला आहे, आधी शहराच्या विकासासाठी काम करा. पुढच्या चार वर्षात शहराचा विकास करुन दाखवा. संभाजी महाराज हे महापुरुष होते. त्यांचं नाव द्यायचं असेल तर आधी शहराचा विकास करा. त्यानंतर नाव बदलण्यासाठी आम्ही तुम्हाला साथ देऊ” औरंगबादमध्ये जलील यांनी हे वक्तव्य केलं आहे.
इम्तियाज जलील म्हणाले, ” इथल्या कट्टर शिवसैनिकांना विचारा की त्यांना औरंगाबादचं नाव बदलायचं आहे की विकास करायचा आहे? संभाजी महाराजांचं नाव औरंगाबादला देण्याच्या गोष्टी करणाऱ्या शिवसेना आणि मनसेने चार वर्षात शहराचा विकास करुन दाखवावा. तुम्ही कचरामुक्त शहर करुन दाखवा, विकास घडवून दाखवा. तसंच केल्यास मी स्वतः तुम्हाला नामांतरासाठी साथ देईन