मुंबई-एकनाथ शिंदे माघार घेण्यास तयार नसून त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा समावेश असलेला शिवसेनेचा नवा गट स्थापन केल्याचे म्हटले जात आहे. या सर्व घडामोडी घडत असताना विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी १६ बंडखोर आमदारांना नोटीस बजावली आहे. नोटिशीचे उत्तर न दिल्यास या आमदारांवर कारवाई केली जाऊ शकते.
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी १६ बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा नोटीस बजावली आहे. या १६ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने केली होती. याच मागणीची दखल घेत झिरवळ यांनी ही नोटीस बजावली असून त्यांना ४८ तासांचे अल्टिमेटम दिले आहे. त्यामुळे आता शिंदे गटातील बंडखोर आमदार काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या नोटिशीनंतर शिंदे गटातील आमदार न्यायालयात जाण्याची शक्यता असून झिरवळ ते यांच्या नोटिशीला आव्हान देण्याची शक्यता आहे. या नोटिशीबद्दल बंडखोर आमदार भरत गोगावले यांनी असे म्हटले आहे कि,“आम्हाला नोटीस देण्यात आली हे खरं आहे. काळजी करण्याचे कारण नाही. त्यांना उत्तर दिलं जाईल. निलंबन होणार नाही. कोर्टात जाण्याची वेळ आली तर ते करावे लागेल. आम्ही लांब आहोत, कोणालातरी घरी नोटीस दिली आहे. आम्ही अजूनही कोणत्या पक्षात गेलेलो नाही. पक्ष सोडलेला नाही. आम्ही आमच्या पद्धतीने काम करतोय. बैठकीला का येऊ शकलो नाही त्याबद्दल उत्तरात सांगू. नोटिशीला उत्तर देऊ. एकनाथ शिंदे यांनी त्याबाबत प्रक्रिया सुरु केली आहे. काळजीचे कारण नाही,” असे भरत गोगावले यांनी सांगितले.