“मुंबई-गद्दारांना क्षमा नाही असं दिघे साहेबांचं ब्रीदवाक्य होतं. शिवसेना कोणत्याही नेत्यामुळे नाही तर सर्वसामान्य शिवसैनिकांमुळे घडली आहे. त्यामुळे येथे एखादा नेता नाही राहिला तरी शिवसैनिकांकडे बाळासाहेबांचे, आनंद दिघेंचे विचार, तत्वं आहेत. त्यामुळे शिवसेना यापुढे अधिक जोमाने जाईल,” असं आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांनी एबीपी माझाशी सांगितलं आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याने महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप आला आहे. एकनाथ शिंदे राजीनामा देण्याची शक्यता असल्याने शिवसेना भवनासमोर शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. यासोबत पक्षाचे नेतेही पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. केदाऱ शिंदेही शिवसेना भवनाबाहेर उपस्थित असून यावेळी त्यांनी या प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.“एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल खंत आहे. दिघे साहेबांची शिकवण असलेल्या नेत्याकडून असं होणं अपेक्षित नाही. दिघे साहेब असते तर असं घडलंच नसतं. त्यांनी संघटनेशी गद्दारी सहनच केली नसती. एकनाथ शिंदे १०० टक्के चुकले आहेत,” असं केदार दिघे यांनी सांगितलं.“एकनाथ शिंदेंनी शिवसेना वाढवण्यात महत्वाची भूमिका घेतली. पण यावेळी ते एकटे नव्हते तर लाखो शिवसैनिक होते. त्यामुळे कोणत्याही नेत्याने आपण एकटेच शिवसेना वाढवतो असं समजू नये. शिवसैनिकांमुळे ही संघटना वाढली आहे,” असं केदार दिघेंनी सांगितलं. नेतृत्व सांगेल त्याप्रमाणे पुढील वाटचाल असेल असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.