नागपूर -शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती म्हणजे विनाशकाले विपरित बुद्धी आहे, अशी घणाघाती टीका शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तर शिवसेनेची सत्तेविना मती गेली, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चिमटा काढलाय.फडणवीस नागपूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शिवसेनेवर खास आपल्या शब्दांत जोरदार टोलेबाजी केली. भाजपच्या इतर नेत्यांनीही या युतीवर हल्लाबोल केला.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. शिवसेना पुन्हा उभारी घेण्यासाठी प्रयत्न करत असतानाच राज्यात नवे राजकीय समीकरण तयार झाले आहे. राज्यात शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्यात युती झाली आहे. प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी तसेच संविधान टिकवण्यासाठी युती केली असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. तर शिवसेनेसोबत का युती केली, याचे कारण संभाजी ब्रिगेडनं स्पष्ट केले आहे. तर यावरूनच विरोधकांकडून शिवसेनेवर चौफेर टीका केली जात आहे.शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मी यावर एवढेच म्हणेन की विनाशकाले विपरित बुद्धी. नागपूरमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.