नागपूर – दिशा सालियन मृत्यूप्रकरणाची SIT मार्फत राज्य सरकारने चौकशी करावी, या मागणीसाठी आज सत्ताधाऱ्यांनीच विधानसभा सभागृहात गोंधळ घातला. यामुळे सभागृह तब्बल तीनदा तहकूब करावे लागले.यावर सत्ताधाऱ्यांनीच सभागृहात गोंधळ घालायचा नसतो, असे खडेबोल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुनावले. तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अखत्यारित असणाऱ्या सीबीआयनेच दिशा सालियनने आत्महत्या केल्याचे स्पष्ट केले आहे. अशात राज्यातील शिंदे गट व भाजप नेत्यांचा अमित शहांवर विश्वास राहिला नाही का?, असा सवाल ठाकरे गटाचे नेते, आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे. संपलेल्या प्रकरणाचे खुसपट विधिमंडळाबाहेर मविआ नेत्यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांच्या या वर्तवणुकीचा तीव्र शब्दांत निषेध केला.
अजित पवार म्हणाले, दिशा सालियनचा मृत्यू झाला तेव्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. तेव्हा आमच्या सरकारवर विश्वास नाही म्हणून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. नंतर सीबीआयने या प्रकरणाचा तपास करत दिशा सालियानने आत्महत्या केल्याचे स्पष्ट केले व न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला. त्यामुळे हे सगळ प्रकरण संपलेले असताना सत्ताधाऱ्यांकडून उगीचच या प्रकरणाचे खुसपट बाहेर काढले जात आहे. सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घालायचा नसतो अजित पवार म्हणाले, आज आम्हाला सभागृहात अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडायचे होते. मात्र, विनाकारण दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणावरून गोंधळ करत सत्ताधारी सभागृहाचा वेळ वाया घालवत आहेत. मुळात सत्ताधारी पक्षाने सभागृहात गोंधळ घालायचा नसतो. सत्ताधारी पक्षाने सभागृहात शांतता ठेवायची असते. विरोधकांनी आपल्या मागण्यांसाठी गोंधळ केल्यास सत्ताधाऱ्यांनी यातून मार्ग काढायचा असतो. मात्र, राज्यात उलटेच घडत आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्ष व उपाध्यही यावर तोडगा काढत नाही, अशी नाराजी अजित पवारांनी व्यक्त केली. शहांच्या शब्दाला कवडीची किंमत नाही ठाकरे गटाचे नेते भास्करराव जाधव म्हणाले की, सभागृहात सत्ताधाऱ्यांचे वर्तन हे बेजबाबदार व नियमबाह्य आहे. भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दबंग नेते म्हणून ओळखले जातात. मात्र, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई त्यांच्या शब्दाला कवडीची किंमत देत नाही, हे त्यांच्या वारंवार केल्या जाणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे आता अमित शहांच्याच अखत्यारित असलेल्या सीबीआयचा तपास शिंदे गट व भाजप नाकारत आहे. बसवराज बोम्मईंप्रमाणेच भाजप व शिंदे गटातील नेत्यांचाही अमित शहांवर विश्वास नाही का?, असा सवाल भास्करराव जाधवांनी केला.