पुणे: मी ३५ वर्ष जमिनीचे व्यवहार करतो.एकही केस नाही. सहा वर्षात कोणावर अन्याय केला असेल तरी सांगावे. मात्र, गजा मारणे प्रकरणात वापरण्यात आलेली गाडी राष्ट्रवादी पक्षाशी निगडित असून देखील मला अटक करून चौकशी करण्यात आली. पालकमंत्र्यांना कल्पना दिल्या शिवाय अटक होऊ शकत नाही.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असतो तर मला अटक झाली नसती, अशा प्रकरे सत्तेचा दुरुपयोग महागात पडेल असा इशारा भाजप चे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी खासदार संजय काकडे यांनी दिला आहे.
संजय काकडे यांची नुकतीच भाजप च्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत बोलत होते. काकडे म्हणाले,पक्षाने प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करून माझ्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली आहे.यासाठी भाजप पक्षश्रेष्ठींचे आभार व्यक्त करतो.आणि येणाऱ्या काळात पक्षासाठी जे जे काही करायचं असेल ते नक्की करेन.
काकडे पुढे म्हणाले, मुख्यमंत्री मुंबईचा, उपमुख्यमंत्री पुण्याचा परंतू, याच ठिकाणी सर्वात जास्त कोरोना रुग्ण आहेत. याचाच अर्थ परिस्थिती नियंत्रणात नाही.काही झालं की केंद्र सरकारवर ढकलून मोकळे व्हायचं एवढंच काम राज्य सरकार करत आहे. आरक्षणाबाबतीत तेच,काय चाललंय राज्यात कळत नाही.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र, राज्य सरकार म्हणून यापुढे तुम्ही काय करणार याचं उत्तर दिले पाहिजे. मुंबई, पुण्यातील सर्व नागरिकांना लस द्यायला हवी. जेणेकरून सर्व उदयोग व्यवस्थित सुरू होतील.
राज्य सरकारने नियोजन केले पाहिजे. या सरकारमध्ये ताळमेळ राहिलेला नाही. सगळ्या गोष्टी केंद्रावर ढकलून कसे चालेल. आपलं राज्य मोठे आहे.इथे मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे आहेत. त्यामुळे कोरोना आटोक्यात आणला पाहिजे. राजकारण करायला बाकी सर्व आयुष्य पडलं आहे, असेही काकडे यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत त्यांनी मोठं विधान केलं आहे. मी उद्धव ठाकरेंना चांगलं ओळखतो. त्यांची महाविकास आघाडीत घुसमट होत आहे. आज ना उद्या ते नक्कीच आघाडीतून बाहेर पडतील, मी गेल्या अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरेंना ओळखतो. त्यांचा संपूर्ण स्वभाव मला माहीत आहे. . त्यांचं प्रत्येक स्टेटमेंट पाहा. त्यातून ते निराश दिसत आहेत. त्यांना जे काही चाललंय ते आवडत नाही. ते आज ना उद्या महाविकास आघाडीतून स्वत:हून बाहेर पडतील. ते अधिक काळ महाविकास आघाडीत राहणार नाहीत, असं संजय काकडे म्हणाले. शिवसेना गेली 25 वर्षे युतीत होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून मला वाईट वाटते, असंही ते म्हणाले.
पंढरपूर मंगळवेढा येथे महाविकास आघाडी एकत्र असताना भाजपा उमेदवाराचा विजय झाला यावरून पुढेही काय चित्र असेल ते लक्षात घ्या .
“शरद पवारही मराठा आरक्षण देऊ शकले नाहीत, ते फडणवीसांनी दिलं होतं; आघाडीला तेही टिकविता आलं नाही..”
मराठा आरक्षणाची मागणी १९८५ पासून केली जात आहे. तेव्हापासून आजवर झालेल्या मराठा मुख्यमंत्र्यांनी आरक्षण देण्याची धमक दाखविली नाही. तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले आणि ५० वर्षांची राजकीय कारकीर्द असलेले शरद पवारही मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले नाहीत. ते आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी देण्याची हिम्मत दाखविली. ते सुद्धा या सरकाराला टिकविता आले नाही. त्यामुळे आगामी काळात आरक्षणाच्या मुद्द्यावर नेमके काय करणार आहात असा सवाल माजी खासदार आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी केला आहे.