उदयपूर – पुढील निवडणुकांपूर्वी तिकीट देण्याच्या बाबतीत काँग्रेसने मोठा फेरबदल करण्याची तयारी केली आहे. आता एका कुटुंबाकडून एकच तिकीट मिळणार आहे. उदयपूर येथील चिंतन शिबिर येथील संघटनेत बदल आणि राजकीय बाबींवर समितीने ही शिफारस केली आहे.काँग्रेसचे राजस्थान प्रभारी सरचिटणीस अजय माकन यांनी उदयपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले- आमच्या पॅनलमध्ये एका कुटुंबात एक तिकीट हा फॉर्म्युला लागू करावा यावर चर्चा झाली आहे. ज्याला तिकीट दिले जाईल, त्याने किमान 5 वर्षे पक्षात काम केलेले असावे. डायरेक्ट तिकीट देऊ नये. नवोदित नेत्यांना तिकीट मिळणार नाही, मात्र गांधी परिवाराला या नियमात सूट देण्यात आली आहे. हे सूत्र त्यांना लागू होणार नाही.
एखाद्या नेत्याला तीन वर्षांच्या कूलिंग पीरियडनंतर मिळेल दुसरे पद
माकन म्हणाले- सलग पाच वर्षे पक्षात काम केल्यानंतर कोणालाही दुसरे पद देऊ नये, अशी शिफारसही करण्यात आली आहे. किमान 3 वर्षांचा कूलिंग पीरियड असावा. पुढील कोणतेही पद तीन वर्षांच्या अंतरानंतरच दिले पाहिजे.एखाद्या नेत्याच्या मुलाला किंवा दुसऱ्या नेत्याला तिकीट घ्यायचे असेल, तर त्याला किमान पाच वर्षे संघटनेत काम करावे लागेल. सलग 5 वर्षे पदावर न राहण्याचा नियम काँग्रेसमध्ये लागू झाल्यास निम्म्याहून अधिक नेते बाहेर होतील. नेत्यांच्या मुलांनाही पाच वर्षे पक्षात काम केल्यावरच तिकीट मिळणार आहे.
गांधी कुटुंबाला नियमातून सूट
गांधी घराण्यावर या तरतुदीच्या अंमलबजावणीबाबत माकन यांना विचारले असता ते म्हणाले की, हा प्रश्न गांधी घराण्याचा नाही. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक संघटना निवडणुकीच्या प्रक्रियेतून होणार आहे. काँग्रेस अध्यक्ष निवडीचा चिंतन शिबिराशी काहीही संबंध नाही.एक कुटुंब एक तिकीट ही तरतूद गांधी कुटुंबाला लागू होणार नाही, असेही अजय माकन यांनी सूचित केले. काँग्रेसने एक कुटुंब-एक तिकीट फॉर्म्युला लागू करण्याची शिफारस केली आहे, परंतु मोठ्या राजकीय घराण्यांसाठीही वाट सोडली आहे.वास्तविक, काँग्रेस नेत्याच्या कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याला तो 5 वर्षे सक्रिय असेल तरच तिकीट दिले जाईल, काँग्रेसमध्ये नवा सदस्य आल्यास त्याला पहिली 5 वर्षे संघटनेत काम करावे लागेल, त्यानंतरच त्याला तिकीट दिले जाईल.
सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाच्या चिंतन शिबीरात हजेरी लावली असून पक्षाच्या नेत्यांना मार्गदर्शन केले आहे. राजस्थानमधील उदयपूरमध्ये तीन दिवस हे चिंतन सुरु असणार आहेत. यावेळी सोनिया गांधी यांनी भाजपा आणि मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. देशात ध्रुवीकरणाचं वातावरण आणि भीती निर्माण केली जात असल्याचा आरोप यावेळी सोनिया गांधींनी केला.
“पंतप्रदान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या ‘कमाल प्रशासन, किमान सरकार’ या घोषणेचा अर्थ वेदनादयीपणे स्पष्ट झालं आहे. याचा अर्थ देशाला सतत ध्रुवीकरणाच्या स्थितीत ठेवणं तसंच लोकांना नेहमी भीती आणि असुऱक्षित स्थितीत राहण्यात भाग पाडणं आहे. याशिवाय समाजाचा अविभाज्य भाग असलेल्या आणि समान नागरिक असलेल्या अल्पसंख्याकांना अत्याचारित आणि अनेकदा क्रूरपणे लक्ष्य करणे”.नवसंकल्प चिंतन शिबीरच्या निमित्ताने भाजपा, आरएसएस आणि त्यांच्या सहाकऱ्यांमुळे देशासमोर निर्माण झालेल्या अनेक आव्हानांवर चर्चा करण्याची संधी आपल्याला मिळत असल्याचं यावेळी सोनिया गांधींनी म्हटलं.काँग्रेसचं चिंतन शिबीर १३, १४ आणि १५ मे असे तीन दिवस चालणार आहे. २०२४ लोकसभा निवडणुकीआधी पक्षाला मजबूत करणं यामागचा मुख्य उद्धेश आहे. शुक्रवारी चिंतन शिबीरामध्ये मार्गदर्शन करताना सोनिया गांधींनी राष्ट्रीय तसंच अर्थपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्याची ही संधी आहे असं सांगितलं.यावेळी सोनिया गांधींनी संस्थेत बदल गरजेचे असून आपण आपल्या कामाची पद्धत बदलली पाहिजे असं स्पष्ट मत मांडलं. “आपल्या वैयक्तिक अपेक्षांपेक्षा संस्थेला वरती ठेवलं पाहिजे. पक्षाने आपल्याला भरपूर काही दिलं असून आता परतफेड करण्याची वेळ आहे,” असं सोनिया गांधींनी सांगितलं.
तत्पूर्वी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले की, “यूपीए सरकारच्या काळात लोक काय म्हणतील याचा विचार केला जात होता. पण, आज या लोकांनी धर्माच्या नावाने संपूर्ण देश ताब्यात घेतला आहे. धर्म, जातीच्या नावाने दंगली पेटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता राजस्थान त्यांच्या हिटलिस्टवर आहे. राज्यात केव्हाही दंगली, सीबीआय व ईडीची छापेमारी सुरू होते.”
गहलोत म्हणाले -“देशाने 70 वर्षांत खूप प्रगती केली. काँग्रेसचे सिद्धांत, धोरण देशाच्या डीएनए सारखी आहेत. त्यानंतरही ते निर्लज्जपणे काँग्रेसने 70 वर्षांत काय केले असा प्रश्न करतात. आम्ही काम करतो. पण, मार्केटिंग करत नाही. हा आमचा कच्चा दुआ आहे. याऊलट हे खोटारडे लोक काम कमी व मार्केटिंग जास्त करतात. कधी गुजरात मॉडेलची गोष्ट करतात.”
लेकसिटीच्या ताज अरावलीत होणाऱ्या या शिबिरात काँग्रेसच्या ओल्ड गार्डपासून तरुण चेहरे दिसून येत आहेत. येथे येणारे बहुतांश नेते या शिबिरावर समाधान व्यक्त करत आहेत. हे शिबिर सर्वसाधारण इव्हेंट नाही. यात पक्ष नेतृत्वापासून घराणेशाहीपर्यंतच्या मुद्यांवर ठोस निर्णय घेतले जातील, असे ते म्हणालेत.