राज्यसभा निवडणुकीनंतर राजस्थानचे काँग्रेस सरकार अचानक संकटात सापडल्याचे चित्र समोर येत आहे. येथील मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी भाजपवर सरकार पाडण्याचा कट रचत असल्याचे आरोप केले आहेत. आमदारांच्या घोडेबाजारात काँग्रेसच्या आमदारांना 25 कोटी रुपये देत असताना 2 जणांना अटक करण्यात आली आहे. परंतु, या घडामोडी सुरू असतानाच अचानक उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची नाराजी आणि त्यांच्या समर्थकांनी सोनिया गांधींची भेट घेतल्याचे वृत्त आहे. एकूणच परिस्थिती पाहता मध्य प्रदेशमध्ये नुकतेच झालेले कथानक राजस्थानातही घडणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दोन्ही युवा नेत्यांना केवळ निवडणुकीत बनवले होते पक्षाचा चेहरा
उल्लेखनीय बाब म्हणजे, मध्य प्रदेश आणि राजस्थानात विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने युवा नेत्यांनाच मतदारांसमोर प्रस्तुत केले होते. मध्यप्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे, तर राजस्थानात सचिन पायलट प्रचारात काँग्रेसचा चेहरा होते. पण, मध्य प्रदेशात काँग्रेसची सत्ता आली तेव्हा मुख्यमंत्री पदाची माळ ज्योतिरादित्य शिंदे नव्हे, तर कमलनाथ यांच्या गळ्यात पडली. तेव्हापासूनच मध्य प्रदेशात काँग्रेसला उतरती कळा लागली. हीच गत सचिन पायलट यांची होती. त्यांना देखील राजस्थानात विजयानंतर दुय्यम पद देऊन अशोक गहलोत यांना मुख्यमंत्री पद देण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून पायलट आणि गहलोत यांच्या वादाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
दोन्ही युवा नेत्यांमध्ये घनिष्ठ मैत्री
ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट यांच्यात घनिष्ठ मैत्री आहे. याच वर्षी मार्चमध्ये ज्योतिरादित्य भाजपात गेले तेव्हा सचिन पायलट सोशल मीडियावर ट्रेंड करत होते. राजकीय तज्ज्ञांच्या मते, राजस्थानमध्ये गहलोत सरकार पाडण्याच्या हालचाली सुरू होत असतील तर त्यामध्ये ज्योतिरादित्य यांची भूमिका असू शकते. कारण, कमलनाथ यांच्या सरकारमध्ये जी परिस्थिती ज्योतिरादित्य यांची होती तीच गत राजस्थानात पायलट यांची आहे. दोन्ही राज्यांमध्ये या युवा नेत्यांचा मुख्यमंत्र्यांसोबत वाद झालेला आहे.
राजस्थानातील पक्षीय बलाबल
राजस्थानात राजकीय परिस्थिती पाहिल्यास काँग्रेसकडे 107 आमदार आहेत. यासोबतच, सरकारला 13 अपक्ष आणि एका राष्ट्रीय लोक दलाच्या आमदाराचे समर्थन आहे. अर्थात गहलोत यांच्याकडे 121 आमदारांचे समर्थन आहे. राज्यसभा निवडणुकीत हे प्रकर्षाने दिसून आले होते. 200 आमदार असलेल्या राजस्थानाच्या विधानसभेत काँग्रेस अतिशय मजबूत असून भाजपकडे केवळ 72 आमदार आहेत. सद्यस्थितीत बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपला आणि 29 आमदार लागतील.
गहलोत यांचे समर्थक असलेले 13 अपक्ष आमदार भाजपकडे गेल्यास तो आकडा केवळ 85 होईल. काही आमदार फोडले तरीही भाजपकडे 100 आमदार होतील. अपक्ष आमदार फुटल्यानंतरही राजस्थान सरकारवर काही परिणाम होणार नाही. राजस्थानात काँग्रेस पक्ष फोडण्यासाठी दोन तृतियांश आमदारांना बंडखोरी करावी लागेल. अर्थात पक्षांतर बंदी कायद्यानुसार नियम लागू केल्यास काँग्रेसचे सरकार एवढ्यात कोसळेल असे दिसत नाही. काँग्रेसचे आमदार नाराज असले तरीही त्यांची संख्या किती आहे हे पाहावे लागेल.