मुंबई- शिवसेनेचे आदेश आता मातोश्रीवरून निघत नाही तर दिल्लीतल्या ‘मातोश्री’ आदेश देतात आणि ते सेनेवाले ऐकतात अशा शब्दात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. पालघरमध्ये आयोजित जिल्हा परिषदेच्या प्रचारावेळी ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले की, “जनतेशी बेईमानी केलेले हे सरकार काही झाले तरी जास्त वेळ टिकणार नाही. शिवसेना ही सकाळी शेर तर संध्याकाळी ढेर होते. शिवसेनेची लोकसभेत आणि राज्यसभेत वेगवेगळी भूमिका आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जोरावर मुख्यमंत्री बनवण्याचे वचन तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांना दिले होते का? असा सवाल विचारावा लागतो. कारण आता ‘मातोश्री’वरुन नाही, तर दिल्लीतील मातोश्रींचे आदेश ऐकावे लागतात”, असा टोला फडणवीसांनी लगावला.
पुढे ते म्हणाले की, “पालघर जिल्ह्यामध्ये पाच वर्षात सातत्याने येण्याची संधी मला मिळाली. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पालघर जिल्हा 2014 मध्ये अस्तित्वात आला, पण पालघरच्या मतदारसंघांमध्ये 1960 नंतर सर्वात जास्त वेळा कोणी मुख्यमंत्री आला असेल, तर तो मी होतो”, असा दावा फडणवीसांनी केला. “पाच वर्षे सातत्याने येऊन पालघरच्या समस्या घेतल्या, विविध घटकांपर्यंत आपल्याला कसे पोहचता येईल, सरकारच्या योजना कशा पोचवता येईल याचा प्रयत्न केला. आपल्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा प्रचंड यश मिळाले होते, पण विरोधी पक्षनेता म्हणून निवडून आलो”, असेही फडणवीस म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, ”शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे वचन उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिले होते. पण शिवसेनेचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जीवावर करणार असे वचन दिले होत का? शिवसेनेच्या या वागण्यामुळे बाळासाहेबांना स्वर्गात खूप वाईट वाटत असेल. हिंदुत्ववादी शिवसेनेची आता काय अवस्था झाली आहे हे सगळ्यांना माहित आहे,” अशी टीका फडणवीसांनी केली आहे.