मुंबई-
पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे मुंबई सुद्धा लवकरच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनेल. असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. बोरीवली येथे कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. गेल्या नऊ महिन्यात महाराष्ट्रातल्या महिलांचे जीणे मुश्किल झाले आहे. आबा गृहमंत्री असातना महिला सुरक्षेच्या बाबतीत त्यांनी कधी तडजोड केली नाही. मुंबई शहरात पुन्हा सामाजिक समता, सर्वधर्मसमभाव हा विचार जोपसण्याचे काम राष्ट्रवादीला करायचे आहे. असेही ते म्हणाले.
मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी मुंबईतील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आणि नवनियुक्त जिल्हाध्यक्षांना बळ देण्यासाठी मुंबईच्या सहा जिल्ह्यात कार्यकर्ता मेळाव्यांचे आयोजन केले होते. त्याची सांगता आज उत्तर मुंबई जिल्हा, बोरीवली येथे झाली. जिल्हाध्यक्ष इंद्रपाल सिंह, नगरसेविका संध्या जोशी, सिरिल डिसुजा आणि रिद्धी खुरसंगे याप्रसंगी उपस्थित होते.
कार्यकर्ता मेळाव्याची सांगता दर्जेदार पद्धतीने होत आहे, याचा मला आनंद आहे. मुंबई प्रदेशच्या पाठीमागे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठामपणे उभा राहणार आहे. मुंबईच्या प्रत्येक आंदोलनामध्ये राज्य पातळीवर सर्व नेते उभे राहतील. या मेळाव्यानिमित्त पक्षप्रवेश करणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. चला उठूया आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊया, अशी गर्जना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली.
नेपोलियन बोनापार्ट जसजसा पुढे चढाई करत गेला तसतसा मागचा प्रदेश गमावत गेला. आज तीच अवस्था मोदींची झाली आहे. ते गुजरातेहून दिल्लीत गेले आणि आज गुजरात अस्वस्थ आहे. त्याचप्रमाणे ते दिल्ली सोडून आता जगभर फिरत आहेत. एके दिवशी दिल्लीही जाईल. अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई प्रभारी आणि मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी या प्रसंगी केली.
शरद पवार कृषिमंत्री असताना देशातील कृषी उत्पादनाची आधीच माहिती देऊन भाव नियत्रिंत करत होते. पण मोदीजींचे सरकारपासून जनतेला दाल-रोटीही महाग झाली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. दुष्काळाचे सावट मराठवाड्यावर असतांना मराठवाड्यात दुष्काळ दौरा करायला सरकारला वेळ मिळाला नाही. मात्र सरसंघचालकांनी संघाचा कार्यक्रम मराठवाड्यात लावला आणि १९ मंत्र्यांनी तिथं हजेरी लावली. असेही ते म्हणाले.
आज आपण सत्तेत नाही. विरोधी पक्षात आहोत पण अशावेळी जो कार्यकर्ता पक्षा सोबत राहील तोच सत्ता आल्यावर त्यात सहभागी असेल. गट तट न पाहता आता सर्व जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र यावे. असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केले.