मुंबई- भाजपला नागपूर, अमरावतीत नाराजीचा फटका बसला असे सांगून भाजपने दुसऱ्यांची घरे फोडल्याने त्यांना फटका बसला आहे, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र डागले आहे. अपक्ष आमदार सत्यजित तांबेंबाबत आता हायकमांड निर्णय घेतील. मात्र, भाजपला दुसऱ्याची घरे फोडून आनंद होत आहे. आमचे तांबे कुटुुंबियांसोबत आमचे काही वैर नाही. भाजपकडून सर्व गोष्टी ठरवून केल्या आहेत, आम्हाला केवळ सुधीर तांबेंनी फार्म भरताना घेतलेल्या भूमिकेला विरोध आहे, असा टोलाही यावेळी नाना पटोले यांनी लगावला आहे.
काँग्रेसचे केवळ भाजपविरोधात मोट बांधणे हे ध्येय आहे. नागपूर आणि अमरावतीमध्ये भाजपला अंतर्गत नाराजीचा फटका दुसऱ्यांची घरे फोडल्याने बसला आहे, असा दावा पटोलेंनी केला आहे. तर भाजपा दुसऱ्यांचे घर फोडते. दुसऱ्यांचे घर फोडताना ते हसत आहेत. जेव्हा त्यांचे घर फुटेल तेव्हा त्यांना समजेल, असे सूचक विधान मी केले होते. आज अमरावती नागपूर अशा दोन्ही विभागांमध्ये भाजपच्या अनेक नेत्यांनी आम्हाला मदत केलेली आहे. नागपूर आणि अमरावती येथे भाजपचे सिटींग आमदार होते. तरीही त्यांच्या दोन्ही जागा पडल्या. दुसऱ्याच्या घरात आग लावणाऱ्यांना जनतेनी जागा दाखविली, असा आरोपही नाना पटोले यांनी केला.
सुधीर तांबे यांनी ऐनवेळी पक्षाशी विश्वासघात केला
नाना पटोले म्हणाले की, सुधीर तांबे यांच्याशी बोलणे झाले होते., ते लढायला तयार होते. त्यांना कंटीन्यू करतो म्हटल्यानंतर त्यांनी आम्हाला धन्यवाद दिले , त्यांना त्यांच्या मुलाला लढवायचे असते तर त्यांनी ते सांगितले असते, त्यांच्या मुलाच्या बाबतीत सकारात्मक भूमिका घेता आली असती. पण, सुधीर तांबे यांनी ऐनवेळी पक्षाशी विश्वासघात केला, असा आरोप पटोले यांनी केला आहे. तर त्यांच्या घरच्या वादात पडायचे नसल्याचेही यावेळी त्यांनी म्हटले आहे. पुढच्या काळात नाशिकमधून मी काँग्रेसचे पन्नास आमदार निर्माण करेन. तशी रणनीती आम्ही तयारी केली आहे. त्या रणनीतीमध्ये आम्हाला यश येईल,” असेही नाना पटोले यांनी सांगितले.