रायगड -‘राज्यात अनेक शिक्षण संस्था आहेत. कोरोनामुळे अनेक परीक्षा रद्द झाल्या आहेत. आयआयटीने परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. जगातील ख्यातनाम अशा ऑक्सफोर्ड विद्यापीठ, अन्य चांगल्या विद्यापीठांनी परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र शासनाने घेतलेला निर्णय आणि त्यात अगदीच चुकीचे कोणी केले आहे होत असे नाही. मात्र राज्यपालांचे ज्ञान अर्थात आपल्यापेक्षा मोठे असेल’, असा घणाघात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केला.
शरद पवार यांनी महाराष्ट्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त कोकण भागाचा दौरा केला. दोन दिवस पवारांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. यादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यावर प्रकास टाकला. राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षांवरुन राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असे चित्र असताना, पवारांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला.
देवेंद्र फडणवीसांनाही टोला
यावेळी शरद पवारांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कोकण दौऱ्यावरही निशाना साधला. पवार म्हणाले की, ‘मी बारामतीसारख्या दुष्काळी भागातून येतो. देवेंद्र फडणवीस विदर्भातून येतात. समुद्राशी काहीही संबंध नाही. त्यामुळे ते येत आहेत तर चांगलच आहे. प्रत्येकाला ही परिस्थिती समजेल आणि ज्ञानात भर पडेल.’दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारच्या परीक्षेऐवजी श्रेणीच्या निर्णयाला प्रलंबित ठेवत विद्यापीठ कायद्याप्रमाणे निर्णय होईल, अशी भूमिका घेतली आहे. याबाबत राज्यपालांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा विद्यापीठ कायद्याप्रमाणे घेण्यात येतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निर्णय कळवले आहे.