पुरस्काराचे मानकरी समारंभाच्या प्रतिक्षेत..!!
मुंबई- सांस्कृतिक कार्य विभागाच्या “तारीख पे तारीख”या तारखाच्या घोळामुळे सध्या अनेक सांस्कृतिक पुरस्कार वितरण समारंभ लांबणीवर पडले आहे. गेल्या सात महिण्यापूर्वी तमाशा सम्राज्ञी कै विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव हा जेष्ठ तमाशा कलावंताला देण्यात येणारा मानाचा पुरस्कार जाहीर होवून सुद्धा वितरण सोहळ्याला मुहूर्तच मिळत नसल्याने,ह्या पुरस्काराच्या मानकाऱ्यांना अजून किती वर्ष या पुरस्कार सोहळ्याची वाट पहावी लागणार आहे. असा प्रश्न सध्या सांस्कृतिक कार्य विभागाला विचारला जात आहे.
अद्वितीय कलागुणांसह तमाम तमाशा रसिकांच्या मनात आढळ स्थान निर्माण करणाऱ्या तमाशा सम्राज्ञी कै विठाबाई नारायणगावकर यांच्या नावाने सांस्कृतिक कार्य विभाग दरवर्षी एका जेष्ठ तमाशा कलावंताला पुरस्कार जाहीर करते.
दि.४ एप्रिल २०२२ रोजी तत्कालीन सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी एका बैठकीव्दारे विविध पुरस्कार समितीच्या बैठका घेवून पुरस्कारकर्त्याच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते.त्यानुसार सन २०१९- २०२० या वर्षाचा तमाशा सम्राज्ञी कै विठाबाई नारायणगाकर जीवनगौरव पुरस्कार, विठाबाई
यांची कन्या संध्या रमेश माने (सोलापूर) यांना तर सन २०२०-२०२१ या सालाच पुरस्कार जेष्ठ तमाशा कलावंत आतांबर शिराढोणकर(सांगली) यांना जाहीर करण्यात आला होता.त्यानुसार दि.१९जुलै २०२२ रोजी शासन निर्णय” सांस्कृतिक कार्य विभागाने जारी केला आहे.
पण तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या “धीर से चलो बाबू” या कार्यपद्धतीमुळे अनेक सांस्कृतिक सोहळ्यांना त्यांना मुकावे लागले.त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले,पण त्यांना योग्य पद्धतीने त्यांच्या निर्णयाचा प्रसार करता आला नाही.दुर्दैवाने राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी झाल्यावर सत्तांतर झाले,अन सरकार बदलले.
सध्या राज्याचे सांस्कृतिक कार्य विभागाची जबाबदारी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे आहे.अत्यंत कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांची ओळख आहे.प्रत्येक कामात त्यांचा पाठपुरावा जोरदार असतो.मात्र सध्याच्या त्यांच्या कार्यबाहुलमुळे अनेक पुरस्कार वितरण सोहळे लांबणीवर पडले आहेत.
कोणताही जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांचा । वितरण सोहळा हा जास्त उशिरा करण्यात येवू नये,असे संकेत आहेत.कारण हे सर्व पुरस्कार सांस्कृतिक कार्य विभाग हे जेष्ठ-श्रेष्ठ व्यक्तीला देत असतात.त्यामुळे त्यांची तबेत आणि वयोमानाचा मान राखून सदर पुरस्कार लवकरात लवकर वितरण करण्याचा पायंडा आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाने ऑक्टोबर २०२२पासून सांस्कृतिक कार्य मंत्री कार्यालयाला पत्रव्यवहार करून प्रलंबित वितरण सोहळ्याकरिता मंत्री महोदयांची तारीख मागितली आहे.मात्र अद्याप तारखा उपलब्ध नसल्याचे मंत्री कार्यालयातून सांगण्यात येत आहे. डिसेंबर २०२२मध्ये नागपूरच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राज्य सांस्कृतिक पुरस्कार देण्याचे निश्चित झाले होते.ज्यांना राज्य पुरस्कार जाहीर झाले होते त्यांनी तर नागपुराला येण्यासाठी रेल्वेचे आरक्षण सुद्धा केले होते.परंतु सांस्कृतिक मंत्री कार्यालयातुन अचानक सदर पुरस्कार सोहळा रद्द झाल्याचा निरोप आल्याने अनेक पुरस्कार जाहीर झालेल्या मान्यवरांचा हिरमोड झाला होता.
कै विठाबाई नारायणगावकर यांनी आपल्या कलेच्या आधारे संपूर्ण भारतात तमाशाच्या माध्यमातून आपला लौकीक वाढविला.१९६२च्या भारत -चीन युद्धानंतर आपल्या वडीलासह भारतीय जवानांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी त्यांनी सीमेवर जावून जवानांचे मनोरंजन केले.अशा या अष्टपैलू कलावंताचे देशभरातून कौतुक झाले.याची दखल भारत सरकारने घेवून विठाबाईंना राष्ट्रपती पुरस्कार बहाल केला.
विठाबाई नारायणगावकर यांचे दि.१५ जानेवारी २००२ साली निधन झाले. मात्र त्यांच्या कार्याची दखल घेवून सन २००६ साली तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी तमाशा सम्राज्ञी कै. ” विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार” सुरू केला.अशा या महान कलावंताच्या कलावंताबद्दल राज्य सरकार येवढे उदासिन का आहे.याबद्दल लोककलावंतामध्ये नाराजी पसरली आहे.
विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार निवड समितीबद्दल आक्षेप..!
नुकतीच सांस्कृतिक कार्य विभागाने कै विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार निवड समिती घोषित केली आहे.मात्र या समितीच्या निवडीबद्दल कै विठाबाई नारायणगावकर यांचे नातू मोहित नारायणगावकर आणि काही संघटनेने आक्षेप घेतला आहे.
ज्यांना विठाबाई नारायणगावकर यांच्या कार्याची माहिती सुद्धा नाही.अथवा तमाशा क्षेत्राची जाण नाही.अशा काही व्यक्तीची समितीवर सदस्य म्हणून घुसखोरी केली आहे. याबद्दल तमाशा क्षेत्रात अनेक उलटसुलट चर्चा सुरू आहे.त्यामुळे तातडीने सदर समिती बरखास्त करून या निवड समितीची पुनर्रचना करावा.अशी मागणी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात यांच्याकडे लेखी स्वरूपात मोहित नारायणगावकर आणि तमाशा संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव यांनी केली आहे.