नवी दिल्ली – एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्री अमित शहा यांना देशात लाॅकडाऊन लागेल का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, सध्या लाॅकडाऊन लागू करणे म्हणजे घाई करण्यासारखे आहे. गेल्या वर्षीच्या लाॅकडाऊनचा हेतू वेगळा होता, त्यावेळी देशाकडे औषध किंवा लस नव्हती. मात्र आताची स्थिती वेगळी आहे. आम्ही राज्यांसोबत सतत संपर्कात आहोत, सध्यातरी संपूर्ण देश लाॅकडाऊनबाबत कोणताही विचार नाही, असे अमित शहा म्हणाले.भारतात करोना संसर्गाची दुसरी लाट सुरु आहे. करोनाने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. काल (ता.17 एप्रिल) देशात 2 लाख 60 हजाराहून अधिक करोनाबाधित रुग्णांचे निदान झाले तर दिड हजाराहून अधिक जणांचा करोनाने मृत्यू झाला. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्लीसह 12 राज्यांत करोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. ही परिस्थिती पाहता देश लाॅकडाऊनच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. मात्र, सध्या संपूर्ण देशात लाॅकडाऊन लागू करण्याचा कोणताही विचार नसल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या ताज्या अहवालानुसार, गेल्या 24 तासात देशात 2 लाख 61 हजार 500 नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 1501 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक म्हणजे 1 लाख 38 हजार 423 जणांनी करोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.