सेवारत असताना अग्निवीरांना मिळणार स्किल इंडियाचे प्रमाणपत्र, जेणेकरून उद्योजकता आणि नागरी क्षेत्रातील नोकऱ्यांची संधी त्यांना मिळेल
सार्वजनिक क्षेत्रातील बँका, विमा कंपन्या आणि वित्तीय संस्था यांच्याकडून अग्निवीरांना उचित पतपुरवठ्याद्वारे पाठबळ
कॉर्पोरेट उद्योगांकडून अग्निपथ योजनेचे स्वागत, अग्निवीरांची सेवा पूर्ण झाल्यावर त्यांना नोकरीत भर्ती करून घेण्याची व्यक्त केली इच्छा
नवी दिल्ली-
सैन्यदलात भर्ती करून घेण्यासाठीच्या अग्निपथ योजनेविषयीच्या शंकाकुशंकांवर उत्तर देण्यासाठी गेल्या काही दिवसांत भारत सरकारने अनेक लाभदायी आणि बलदायी उपाय घोषित केले असून त्याद्वारे अग्निवीरांना पाठबळ मिळणार आहे. सैन्यदलात चार वर्षे सेवा केल्यानंतर पोलीस दलांमध्ये भर्तीसाठी अग्निवीरांना प्राधान्य दिले जाईल असे गृह मंत्रालय, भारत सरकार आणि विविध राज्य सरकारांनी घोषित केले आहे. अग्निवीरांच्या क्षमतेत वाढ करून त्यांना उज्ज्वल भवितव्याची हमी देण्यासाठी इतरही विविध विभागांनी अग्निपथ योजनेला पाठबळ दिले आहे. त्याशिवाय, त्यांच्या अंगभूत कौशल्यांना जोड दिली गेल्यामुळे, अग्निवीर म्हणजे देशातील सुप्रशिक्षित आणि अत्यंत शिस्तबद्ध अशी युवाशक्ती बनू शकणार आहे. अशी युवाशक्ती राष्ट्राच्या उभारणीत तर उत्तम योगदान देईलच आणि समाजासाठी मानबिंदूही ठरू शकेल.
तटरक्षक दल आणि संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक कंपन्यांमध्ये जागांचे आरक्षण
संरक्षण मंत्रालयाच्या नोकऱ्यांमधील रिक्त जागांमध्ये 10 टक्के जागा अग्निवीरांसाठी राखीव ठेवण्यास संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी मान्यता दिली आहे. हे 10 टक्के आरक्षण भारतीय तटरक्षक दल आणि संरक्षण क्षेत्रातील 16 सार्वजनिक कंपन्यांमध्ये (HAL, BEL, BEML, BDL, GRSE, GSL, HSL, MDL, Midhani, AVNL,AWEIL,MIL,YIL, GIL, IOL, TCL) लागू होईल. या तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी नियमांमध्ये आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील. संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक कंपन्यांनीही त्यांच्या नोकरभर्ती नियमांमध्ये तसेच बदल करावेत असे त्यांना सुचविले जाईल. वरील जागांवर अग्निवीरांना भर्ती करता येण्याच्या दृष्टीने आवश्यक , वयाची अट शिथिल करण्याची तरतूदही करण्यात येईल.
पहिल्या वर्षीच्या भर्तीसाठी वयोमर्यादेत सूट
वर्ष 2022 च्या भर्ती प्रक्रियेसाठी अग्निवीरांसाठीची कमाल वयोमर्यादा 21 वर्षांवरून वाढवून 23 वर्षे करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा सरकारने केली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये भर्ती न झाल्याची वस्तुस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेतला गेला आहे. “भर्ती प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करण्यासाठी लष्कर कामकाज विभाग, संरक्षण मंत्रालय आणि सैन्यदले कटिबद्ध आहेत” असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात भर्ती
अग्निवीरांसाठी केंद्रीय राखीव पोलीस दल (CAPFs) आणि आसाम रायफल्स मध्ये 10 टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला आहे. एवढेच नाही, तर सीएपीएफ आणि आसाम रायफल्समध्ये नियुक्तीसाठी निश्चित असलेल्या कमाल वयोमर्यादेला तीन वर्षांची विशेष सवलत अग्निवीरांना दिली जाईल, अशी घोषणाही गृह मंत्रालयाने केली आहे. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीसाठी कमाल वयोमर्यादा पाच वर्षांसाठी शिथिल केली जाईल, अशी महिती गृहमंत्रालयाने आज ट्विटरवरुन दिली आहे.
मर्चंट नेव्हीमध्ये भर्ती
मर्चंट नेव्हीमध्ये अग्निवीरांना सहजपणे सामावून घेण्यासाठी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाअंतर्गत कार्यरत नौवहन महासंचालनालयाने भारतीय नौदलासह एक व्यवस्था निर्माण करण्याची घोषणा केली आहे.
या अंतर्गत, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने सेवेच्या अशा सहा मार्गांची घोषणा केली आहे ज्याद्वारे अग्निवीरांना, त्यांच्या भारतीय नौदलातील कार्यकाळानंतर मर्चंट नेव्हीमधल्या विविध पदांसाठी निवडले जाऊ शकेल. यामुळे, अग्निवीरांना आवश्यक ते प्रशिक्षण घेता येईल, तसेच नौदलाचा समृद्ध अनुभव आणि व्यावसायिक प्रमाणपत्र मिळाल्याने जगभरात कुठेही त्यांना उत्तम वेतन/मानधन मिळणाऱ्या मर्चंट नेव्हीची नोकरी मिळू शकेल. जहाजबांधणी आणि बंदरे तसेच जलमार्ग मंत्रालयाच्या महासंचालनालयाने आज मुंबईत ही घोषणा केली.
ह्या सगळ्या उपाययोजनांमुळे अग्निवीरांना त्यांच्या गुणानुक्रमानुसार भारतीय नौदल ते मर्चंट नेव्हीपर्यंत सामावून घेतले जाऊ शकेल. नौदलातील इलेक्ट्रिकल रेटिंगपासून ते मर्चंट नेव्हीमधील इलेक्ट्रो टेक्निकल रेटिंगपर्यंतचे स्थित्यंतर आणि त्यांनतर मर्चंट नेव्ही मध्येच सर्टिफाईड क्लास IV-NCV CoC धारकापर्यंतचा प्रवास, भारतीय नौदलातील स्वयंपाक्यापासून ते मर्चंट नेव्ही मधील सर्टिफाईड कुक पर्यंतचे स्थित्यंतर सहजपणे होऊ शकेल.
अशा सर्व ठिकाणी भारतीय नौदलाच्या माध्यमातून जाण्याची इच्छा असलेल्या अग्निवीरांसाठी जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय INDOS आणि CDC जारी करेल.
अग्निवीरांसाठी काही उपाययोजना तयार करण्यात आल्या असून त्यात मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदविका किंवा इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रिकल शाखेतील आयटीआय व्यवसायिक प्रमाणपत्र यांचा समावेश आहे. त्यांना ह्या पात्रतेसह प्रवेश घेता येईल किंवा भारतीय नौदलातील त्यांच्या कार्यकाळात त्यांना ही पात्रता/पदविका मिळवता येईल.
राष्ट्रीय मुक्त शिक्षण संस्था (NIOS) 10 उत्तीर्ण अग्निवीरांसाठी 12 वीच्या परीक्षेची सोय करणार.
राष्ट्रीय मुक्त शिक्षण संस्था (NIOS) या आपल्या स्वायत्त संस्थेद्वारे शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग 10 वी उत्तीर्ण अग्निवीरांसाठी 12 वीचा विशेष अभ्यासक्रम तयार करणार आहे. लष्करी अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून हा विशेष अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे, जो समकालीन तर आहेच, त्यासोबतच त्यांच्या कामाशी सुसंगत देखील आहे. जेणेकरून 10 उत्तीर्ण अग्निवीरांना आपले शिक्षण सुरू ठेवून 12 वी चे प्रमाणपत्र मिळवता येईल. हे प्रमाणपत्र नोकरी आणि पुढील शिक्षणासाठी संपूर्ण देशात ग्राह्य धरले जाईल. यामुळे पुढील आयुष्यात अग्निवीरांना पुरेसे शिक्षण आणि कौशल्य मिळवून समाजात विधायक भूमिका निभावता येईल. NIOS च्या या विशेष कार्यक्रमामुळे अभ्यासक्रमांना प्रवेश, अभ्यासक्रम विकास, विद्यार्थ्यांना मदत, स्वअभ्यास पुस्तके, अधिस्वीकृत अभ्यास केंद्रे, वैयक्तिक संपर्क कार्यक्रम, मूल्यमापन आणि प्रमाणीकरण यात मदत मिळेल. NIOS ची मुक्त शिक्षण व्यवस्था अतिशय सोपी आहे तसेच अग्निपथ योजनेत सर्व अग्निवीरांच्या आवाक्यात असणारी आहे.
शिक्षण मंत्रालयाचा पदवी अभ्यासक्रम
अग्निवीरांसाठी भविष्यातील करिअरच्या संधी वाढवण्यासाठी आणि नागरी क्षेत्रातील विविध नोकऱ्यांसाठी त्यांना तयार करण्यासाठी, शिक्षण मंत्रालयाने संरक्षण दलातील कर्मचार्यांसाठी एक विशेष तीन वर्षांचा कौशल्य आधारित पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, जो संरक्षण आस्थापनांमधील त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मिळवलेल्या कौशल्य प्रशिक्षणाला मान्यता देईल.
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने हा अभ्यासक्रम तयार केला असून याची अंमलबजावणी देखील तेच करणार आहेत. पदवीसाठी आवश्यक असलेल्या श्रेयांक -क्रेडिट्सपैकी 50% क्रेडिट्स अग्निवीरांनी मिळवलेल्या तांत्रिक आणि बिगर -तांत्रिक कौशल्य प्रशिक्षणातून मिळतील आणि उर्वरित 50 टक्के भाषा, अर्थशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, लोकप्रशासन, समाजशास्त्र, गणित, शिक्षण, वाणिज्य, पर्यटन, व्यावसायिक अभ्यासक्रम, कृषी आणि ज्योतिष यासारख्या विविध विषयांचा समावेश असलेले अभ्यासक्रम तसेच पर्यावरण अभ्यास आणि इंग्रजीमध्ये संवाद कौशल्य संबंधी क्षमता विकास अभ्यासक्रमांमधून घेतले जातील.
हा अभ्यासक्रम विद्यापीठ अनुदान आयोगाचे मापदंड आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत अनिवार्य केल्यानुसार राष्ट्रीय क्रेडिट आराखडा/राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखडा (NSQF) यांच्याशी अनुरूप आहे. या अभ्यासक्रमातून बाहेर पडण्यासाठी विविध मार्गांची तरतूद देखील आहे – प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर पदवीपूर्व प्रमाणपत्र, प्रथम आणि द्वितीय वर्षाचे अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यावर पदवीपूर्व पदविका आणि तीन वर्षांच्या कालावधीत सर्व अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर पदवी मिळेल.
कार्यक्रमाच्या आराखड्याला संबंधित नियामक संस्था – अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद (AICTE) आणि राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण (NCVET) आणि विदयापीठ अनुदान आयोग यांनी मान्यता दिली आहे. युजीसी नामांकनानुसार (BA; B. Com.; BA (व्यावसायिक); BA (पर्यटन व्यवस्थापन), इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाद्वारे पदवी प्रदान केली जाईल आणि रोजगार आणि शिक्षणासाठी भारतात आणि परदेशात तिला मान्यता दिली जाईल.
उद्योजकता आणि रोजगारासाठी कौशल्य विकास
स्किल इंडिया आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (MSDE) सशस्त्र दलांच्या विविध शाखांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना नागरी नोकऱ्यांसाठी अधिक योग्य बनवण्यासाठी अतिरिक्त कौशल्य प्रशिक्षण देतील. अग्निवीरांना सेवेत असताना स्किल इंडिया प्रमाणपत्र मिळेल, ज्यामुळे त्यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आपल्या अर्थव्यवस्थेत निर्माण होत असलेल्या उद्योजकता आणि नोकरीच्या विविध संधींबाबत पाठपुरावा करणे शक्य होईल. अग्निवीरांना सेवेत असताना नोकरी संबंधित आवश्यक कौशल्य प्रमाणपत्रे मिळतील यासाठी स्किल इंडियाच्या सर्व संस्था – प्रशिक्षण महासंचालनालय (DGT), राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC), विविध क्षेत्रातील कौशल्य परिषद, उद्योजकता संस्था NIESBUD आणि IIE, तसेच कौशल्य नियामक संस्था NCVET, यांना या कार्यक्रमाशी जोडले जाईल. नोकरी करत असताना शिकलेली काही कौशल्ये NSQF अभ्यासक्रमाच्या समान समजली जातील. काहींसाठी, अतिरिक्त ऑनलाइन किंवा ऑफलाइन, थिअरी किंवा प्रत्यक्ष कौशल्यांसह त्यांच्या नोकरीच्या प्रत्यक्ष अनुभवाची सांगड घालणे आवश्यक असू शकते. हे तपशील, तसेच सशस्त्र दलांच्या प्रशिक्षकांसाठी कोणतेही प्रशिक्षण, आणि विशेषतः सुरक्षा दलातील प्रशिक्षण मूल्यांकन करणाऱ्यांसाठी, मूल्यांकन आणि प्रमाणीकरण – या सर्व बाबींवर काम केले जात आहे. अभ्यासक्रमातून बाहेर पडण्याच्या वेळी, संपूर्ण कौशल्य परिसंस्था या युवा अग्निवीरांसाठी खुली असेल, त्यांना त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध कौशल्य प्रशिक्षण आणि उद्योजकता अभ्यासक्रमांचा लाभ घेता येईल.
अग्निवीरांसाठी कर्जाच्या सुविधा
अग्निवीरांच्या सेवेचा काळ पूर्ण झाल्यावर त्यांना कोणत्या बँका आणि वित्तीय संस्था पाठबळ देऊ शकतात ते निश्चित करण्यासाठी वित्तीय सेवा विभागाच्या सचिवांची सार्वजनिक क्षेत्रातील बँका (PSBs), सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्या(PSICs) आणि वित्तीय संस्थांच्या (FIs) मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. सार्वजनिक क्षेत्रातील बँका, सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्या आणि वित्तीय संस्था अग्निवीरासांठी त्यांची शैक्षणिक पात्रता आणि कौशल्य यावर आधारित योग्य त्या पदांसाठी सुयोग्य लाभ/सवलती इ. च्या माध्यमातून रोजगार संधी निर्माण करतील, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
व्यवसाय करण्यासाठी आणि स्वयंरोजगाराकरिता कौशल्याचे अद्ययावतीकरण, शिक्षण यांसाठी अग्निवीरांना योग्य प्रकारच्या कर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बँका प्रयत्न करतील, असा देखील या बैठकीत निर्णय घेण्यात आला. मुद्रा, स्टँड अप इंडिया इ. सारख्या सध्या सुरू असलेल्या सरकारी योजनांचा अग्निवीरांना अशा प्रकारे पाठबळ देण्यासाठी जास्त उपयोग करण्यात येईल.
राज्यांच्या पोलिस दलांमध्ये भरतीसाठी प्राधान्य
सशस्त्र दलांमध्ये 4 वर्षे सेवा केल्यानंतर अग्निवीरांना राज्यांच्या पोलिस दलातील पदे भरताना प्राधान्य देण्यात येईल, अशी घोषणा अनेक राज्य सरकारांनी केली आहे. सशस्त्र दलांमध्ये अग्निवीरांना मिळालेल्या प्रशिक्षणाचा आणि शिस्तपालनाचा राज्यांच्या पोलिस दलांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल आणि बंडखोरी, नक्षलवाद आणि नैसर्गिक आपत्तींची हाताळणी करण्याच्या त्यांच्या क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ होईल.
कॉर्पोरेट क्षेत्राकडून अग्निवीरांच्या प्रशिक्षणाचा आणि कौशल्याचा वापर
अनेक कॉर्पोरेट कंपन्या आणि उद्योगांनी सशस्त्र दलातील या नव्या आणि परिवर्तनकारी भरती प्रक्रियेचे स्वागत केले आहे. सशस्त्र दलातील आपली सेवा पूर्ण करणारा, अतिशय उत्तम प्रकारे प्रशिक्षित, शिस्तबद्ध आणि तंत्रज्ञानाचे ज्ञान असलेला युवा वर्ग हा त्या उद्योगांसाठी एक बहुमूल्य ठेवा असेल, असे त्यांनी सांगितले.