शिवसेना पक्षप्रमुखांचे कार्य व लढा गौरवास्पद !आज व ऊद्याही सोबत रहाणार…. साहित्यिक अर्जुन डांगळे, मेधा कुलकर्णी, कवी अरूण म्हात्रे, नीरजा ,डा.महेश केळुसकर ,हेमंत कर्णिक, रवींद्र पोखरकर आदि अनेकांची सदिच्छा भेट
मुंबई दि.१४ : शिवसेनेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयातील निकाल देशातील लोकशाहीचे भवितव्य ठरविणारा असेल असे विचार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्री येथे साहित्यिक आणि अभ्यासू महाराष्ट्रिय सदस्यांसोबत आयोजित बैठकीत केले. अनेक साहित्यिक, लेखक-कवी व महाराष्ट्र अभ्यासू गटाने उद्धवजी ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. या अनौपचारिक बैठकीत राज्यातील सध्याच्या गढूळ राजकीय परिस्थितीवर सर्व साहित्यिक आणि अभ्यासू नागरिकांनी दुःख व्यक्त करत साहित्यिक अस्वस्थ आहेत परंतु तुम्ही केलेले काम व आताचे प्रयत्न ऊद्धव ठाकरे यांचे बाबत आदर वाढविणारे आहेत. आम्ही आपल्या सोबत आहेत हे सांगायलाच ही सदिच्छा भेट असल्याचे कवयित्री नीरजा यांनी सांगितले.
याबैठकीत ऊद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, संघर्षाच्या काळात आपण सर्व आमच्यासोबत आलात त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आपल्या सर्वांचा उपयोग मला मराठी भाषा भवन उभे करण्यात करायचा आहे. यासंदर्भात वारंवार मला आपल्या भेटी घेण्याची इच्छा होती परंतु कोव्हिडंच्या काळात शक्य झाले नाही. परंतु आपण यापुढे भेटीत सातत्य ठेवु तसेच मराठी भाषा भवन आणि आपले साहित्य पुढील पिढीला देण्यासाठी कटिबद्ध राहू असे आव्हान देखील त्यांनी यावेळी केले.
रंगभूमीची परंपरा जोपासणारे दालन उभारण्यासाठी सर्व साहित्यिकांनी साथ देण्याचे आवाहन देखील ठाकरे यांनी यावेळी केले.
सध्या देशात अघोषित आणीबाणी सुरू आहे. सोबत असलेले लोक आपले गुलाम राहिले पाहिजे अशी भावना सध्या देशात दिसत आहे. प्रादेशिक पक्ष किंबहुना प्रादेशिक अस्मिता नष्ट करण्याचा विडा काही लोकांनी उचला आहे.मी मुळात राजकारणी नाही, मला शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचे होते पंरतु परिस्थितीनुसार व जिद्दीने मुख्यमंत्री झालो होतो त्यात देखील चांगले काम करण्याचा प्रयत्न केला असल्याचे ऊद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.
यावेळी सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर सखोल चर्चा झाली. याबैठकीचे नियोजन विधानपरिषद उपसभापती तथा शिवसेना उपनेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले होते. भविष्यात साहित्यिक, लेखक- कवी यांचे नाते वृद्धींगत करण्याचे आवश्यक ती पाऊले ऊचलली जातील असे आश्वासन डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी दिले.
या अनौपचारिक बैठकीत साहित्यिक अर्जुन डांगळे व उपस्थित साहित्यिक यांनी सध्याच्या वातावरणाबाबत साहित्यकही कृतिशील असल्याचे सांगितले. आज सगळ्या राजकीय पक्षांना संपवण्याचा, विरोधकांना संपवण्याचा डाव खेळला जात आहे. अशा वेळी अस्वस्थ होणार्या अनेक लेखक कवींना महाविकास आघाडीकडून थोड्या आशा होत्या. त्यामुळेच धर्माच्या नावावर देशात विद्वेष पसरवण्याच्या काळात आघाडीच्या सर्व लोकांसोबत तसेच मराठीला आणि महाराष्ट्राला जपणार्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकाधिकारशाही न मानणारे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे सारे संवेदनशील लेखक कवी आहेत हे सांगण्यासाठी ही सदिच्छा भेट घेतली असल्याचे उपस्थित साहित्यिकांनी व अभ्यासू गटाच्या सदस्यांनी सांगितले.
त्याचबरोबर अभ्यासू महाराष्टीय गटाने सोशल मीडियाच्या माध्यमातून हवी ती मदत करण्याचे आश्वासन मेधा कुळकर्णी यांनी यावेळी दिले. यावेळी डॉ.महेश केळुसकर, नीरजा, अरुण म्हात्रे, संदेश भंडारे, प्रा.महेन्द्र भवरे,योगीराज बागुल, रमेश शिंदे, मंदाकिनी पाटील, योगिनी राऊळ, अमोल नाले, विनय शिर्के, दिलीप सावंत, दिपक कांबळी, मिटिंगला
‘अभ्यासू महाराष्ट्रीय’ गटाचे स्वाती वैद्य, नेहा राणे, सविता दामले, मनाली गुप्ते, मृणालिनी जोग, हेमंत कर्णिक, मेधा कुळकर्णी, उत्पल व बा, तुषार गायकवाड, रवींद्र पोखरकर, कौस्तुभ खांडेकर उपस्थित होते.