पुणे- वेश्याव्यवसाय स्वेच्छेने केला जातो काय ? अन्यायाने आणि जबरीने किंवा त्यास भाग पडून जर देहविक्री व्यवसायात ढकलले जात असेल तर अशा व्यवसायाला प्रतिष्ठा देणे हे अमानुष व्यवसाय पद्धतीला प्रतिष्ठा देण्यासारखे ठरणार नाही काय ? असा सवाल प्रख्यात साहित्यिक आणि इतिहास संशोधक संजय सोनवणी यांनी उपस्थित केला आहे. काल बुधवार पेठेत झालेल्या एका कार्यक्रमात अमृता देवेंद्र फडणवीस यांनी वेश्याव्यवसायाला प्रतिष्ठा दिली पाहिजे अशा स्वरूपाचे वक्तव्य केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर सोनवणी यांनी याच विषयावर मात्र अमृता फडणवीसांचा उल्लेख न करता आपले मत व्यक्त केले आहे.
संजय सोनवणी यांनी असे म्हटले आहे कि,’ एके काळी वेश्याव्यवसायाला भारतात प्रतिष्ठाच होती. गणिका/नगरवधू या नावांनी ओळखलं जाणारा हा वर्ग. आम्रपालीसारखी इतिहासप्रसिद्ध स्त्री गणिकाच होती. वसंतसेना तर एका नाटकाची नायिकाच आहे. जातके आणि असंख्य लोककथांत गणिकाच्या हृद्य कथा येतात. सरोवर ते विहिरींच्या निर्मितीत गणिकानी सढळ दान दिल्याचे लेख उपलब्ध आहेत. कान्होपात्रा तर संतपदाला पोचली होती. कुट्टनिमत हा ग्रंथ तर तरुण वेश्यांना प्रशिक्षण देण्यासाठी लिहिला गेला होता. पण आता हा व्यवसाय स्वेच्छेने महिला क्वचितच करतात. बव्हंशी महिला या व्यवसायात जबरीने ढकलल्या जातात. आवडीचा भाग त्यात नसतो. ज्यात आवडच नाही त्या व्यवसायाबद्दल प्रेम वाटणे शक्य नाही. असतो तो नाईलाज आणि जबरदस्ती. त्यात जबरीने आलेली धंदेवाईक व्यावसायिकता असली तरी ती मालकांच्या इशा-यावर. स्वेछेची व्यावसायिकता असल्याचा संभव क्वचितच असू शकतो. मित्रवर्य समीर गायकवाड यांनी त्यांच्या दुरावस्थेबद्दल विपुल लेखन केलेले आहे. त्यामुळे देहविक्रीला व्यवसाय मानून प्रतिष्ठा द्या असे विधान करणे वरकरणी ठीक वाटले तरी ज्यांना प्रतिष्ठा द्यायची गोष्ट होतेय त्यांना ती हवी आहे काय हा प्रश्न आहे. प्रतिष्ठा मानवतेच्या नात्याने अन्याय/विटंबना सोसणा-या वेश्यांना व्यक्ती म्हणून द्या कि अन्यायाने लादलेल्या देहविक्रीला द्या? यातून उपस्थित होणारा दुसरा प्रश्न म्हणजे कायदा येथे काय म्हणतो? या व्यवसायाला कायदेशीर मान्यता, परवाना पद्धती वगैरे सोपस्कार आहेत काय? येथे येणा-या स्त्रिया/मुली कोठून व का येतात, कशा आणल्या जातात याची पाहणी करणारी नि:पक्षपाती यंत्रणा अस्तित्वात आहे काय? वेश्यांचा आत्मसन्मान कायम राहून त्यांना कोणत्याही दडपणाशिवाय केवळ स्वेच्छेने हवा तेंव्हाच आणि अपेक्षित मोबदल्यातच व्यवसाय करता येईल अशा तरतुदी आहेत काय? असे काही नसेल तर वेश्यांना सन्मान किंवा प्रतिष्ठा द्या म्हणणे म्हणजे अमानुष व्यवसायपद्धतीला सन्मान द्या असे म्हणण्यासारखे होईल. वेश्या मात्र त्यापासून वंचित तर राहतीलच त्यांच्या दृष्टीने समाज हा अधिकच हास्यास्पद होऊन जाईल. त्यांच्या वेदना मात्र मुकच राहतील. विकृत समाजात एवढेच होऊ शकते. समाजस्वास्थ्यासाठी हाही एक व्यवसाय गरजेचा आहे असे वाटत असेल तर या व्यवसायाचा आणि त्यातील सहभागी स्त्रियांसाठीचा अत्यंत नव्याने व्यापक विचार करावा लागेल. उथळ विधाने करणे कामी येणार नाही. असे सोनवणी यांनी म्हटले आहे.