चित्ररथातून उलगडणार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंतीनिमित्त कॅटलिस्ट फाउंडेशनचा अनोखा प्रयोग, विविध संघटनांशी सकारात्मक चर्चा
पुणे — घटनाकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभरात उत्साहात साजरी होते. परंतु, केवळ जल्लोष आ णि उत्साह यापलीकडे जाऊन डॉ.बाबासाहेबांचे महान व द्रष्ट्ये विचार चित्ररथातून प्रभावीपणे मांडण्यासाठी कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने प्रयत्नशील असून नुकतीच त्यांनी यासंदर्भात महावीर जैन विद्यालय येथे बैठक घेतली.
यावेळी सामनाचे संपादक अरुण निगवेकर, सीआयडीचे माजी प्रमुख अशोक धिवरे, नगरसेवक अविनाश साळवे, दीपक पोटे, उमेश गायकवाड, बापू मानकर, परशुराम वाडेकर, महावीर जैन विद्यालयाचे सचिव युवराज शहा, रिपब्लिकन नेते असित गांगुर्डे, सामाजिक कार्यकर्ते दत्ताजी गायकवाड, जयेश कासट, डॉ. अंबरीश दरक, कायदेतज्ञ असीम सरोदे, वरिष्ठ पत्रकार संभाजी पाटील, डाॅ. शैलेश गुजर यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आपली संकल्पना उपस्थितांसमोर मांडताना माने म्हणाले की, प्रजासत्ताकदिनी राजधानी दिल्लीत चित्ररथांची देखणी परेड होते. सामाजिक प्रबोधन ते विविधतेने नटलेली आपली संस्कृती याचे यथार्थ दर्शन या परेडमधून देशाला घडते. याच धर्तीवर चित्ररथासारख्या दृकश्राव्य व कल्पक माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र उलगडणारी भव्य मिरवणूक पुण्यातून निघेल. प्रत्येक चित्ररथाचे तज्ज्ञांकडून परीक्षण होईल. प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकास अनुक्रमे रु.१.५०लाख, रु.१ लाख व रु.७५ हजार असे बक्षिसाचे स्वरूप असेल. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल. केवळ औचित्य म्हणून ही मिरवणूक न होता याचा पायंडा पडेल. स्पर्धेचे स्वरूप दिल्याने केवळ आंबेडकरवादी घटकांपुरतीच ही संकल्पना मर्यादित न राहता समाजातील सर्व घटक यात उत्स्फूर्तपणे सहभागी होतील. बाबासाहेबांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटना मांडतानाच बाबासाहेबांचे व्यक्त-अव्यक्त, प्रकाशित-अप्रकाशित पैलू जनसामान्यांपर्यंत पोहोचतील. त्यांचे
प्रेरक विचार तरुण पिढीत रूजतील. भविष्यात त्यांच्या विचारधारेवर पुढे जाणारा उज्ज्वल व सामर्थ्यशाली भारत घडेल, असा हेतू त्यांनी उपस्थितांसमोर मांडला.
माने यांच्या संकल्पनेचे उपस्थितांनी स्वागत केले. शहरातील प्रमुख भागांमध्ये जाऊन तेथील विविध संघटनांशी स्वतंत्र चर्चा करावी, या मिरवणुकीत पर्यावरण, ध्वनी प्रदूषण व रहदारीसारख्या विषयांचे भान राखले जावे, यात सहभागी होणाऱ्या पथकांसाठी विशिष्ट नियमावली आखावी, संकल्पनेचे नाविन्य लक्षात घेता किमान प्रथम वर्षी तरी स्पर्धकांना आवश्यक ती
सर्व मदत करण्यासाठी कॅटलिस्ट फाउंडेशनची स्वतंत्र यंत्रणा असावी, अशा सूचना उपस्थितांनी केल्या. यावेळी असीम सरोदे यांनी आरोग्याच्या मुद्दावर लक्ष वेधत मॅरेथॉन स्पर्धा घेण्याचेही सुचविले. आंबेडकर जयंतीनिमित्त राबविण्यात येणाऱ्या या आगळ्या वेगळ्या संकल्पनेवर प्राथमिक चर्चा सकारात्मकपणे पार पडली.