मुंबई – मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १२ रुग्णांनी कोरोना या जीवघेण्या विषाणूच्या साथीवर विजय मिळवला आहे. पाॅझिटिव्ह असलेल्या या १२ रुग्णांच्या दोन स्राव चाचण्या चक्क निगेटिव्ह आल्या आहेत. त्यातील ८ रुग्णांना मंगळवारी सायंकाळी घरी सोडण्यात आले. तर, इतर ४ रुग्णांना दोन-चार दिवसात डिस्चार्ज देण्यात येणार आहे.राज्यातील पाॅझिटिव्ह असलेले १५ कोरोनाग्रस्त पूर्णत: बरे झाले असून त्यांना लवकरच डिस्चार्ज दिला जाणार आहे. यातील १२ मुंबईचे असून २ पुण्यातील आणि १ औरंगाबादमधील रुग्ण आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना दिली.
बृहन्मुंबई महापालिकेने या रुग्णांचा घरी जातानाचा फोटो मंगळवारी ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये डॉक्टर, नर्स सोबत एक व्यक्ती आणि लहान मुले दिसत आहेत. कस्तुरबा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी या रुग्णांवर उपचार करण्यासाठी अथक प्रयत्न केले. डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळेच रुग्ण बरे होऊन आपल्या घरी जाऊ शकले.
आपल्याला या महामारीच्या आजारातून वाचवल्याबद्दल डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांनी त्यांच्यावर उपचार करणारे डाॅक्टर्स व नर्स यांचे आभार मानले. पाॅझिटिव्ह असलेल्या १२ रुग्णांना निगेटिव्ह करण्यात कस्तुरबाच्या डाॅक्टरांना यश आल्यामुळे काेरोनावर मातही करता येते, असा विश्वास आरोग्य यंत्रणेत निर्माण झाला आहे. डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांना घरी गेल्यानंतरही १४ दिवस आयसोलेशनमध्ये म्हणजे एकटे राहण्यास सांगण्यात आले आहे. पालिकेचे डाॅक्टर त्यांच्या प्रकृतीवर कायम लक्ष ठेवून राहणार आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य अधिकारी डाॅ. दक्षा शहा यांनी दिली. गेल्या २४ तासांत मुंबईत ८४१ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील ९४ रुग्णांना भरती करण्यात आले आहे. त्यातील ५ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळले आहेत. त्यात ४ मुंबईचे, तर एक रुग्ण बाहेरचा आहे.