वायू गळती झालेल्या कंपनीला दिली भेट
महाड दि. २२ जानेवारी – महाड एमआयडीसी मधील कंपन्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. त्यामुळे येथील एमआयडीसी ही स्थानिक नागरिकांना दिलासा देण्यासाठी उभारण्यात आल्या आहेत की कामगारांना मृत्यूच्या दारी ढकलण्यासाठी उभारण्यात आल्या आहेत? असा सवाल विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थितीत केला आहे. तसेच एमआयडीसी मधील सर्व कंपन्यांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून केलेल्या उपाययोजनांचा अहवाल तातडीने दाखल करावा व कंपन्यांमधील होणाऱ्या वायू गळतीच्या प्रकरणावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश दरेकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
महाड एमआयडीसीमधील इंडो अमाईन्स लिमिटेड कारखान्यात एच टू एस (हायड्रोजन सल्फाइड ) या मानवी आरोग्यास घातक असणाऱ्या वायूची गळती झाल्यामुळे कंपनीतील सात कामगार बाधित झाल्याची घटना काल सायंकाळी उशिरा घडली. यानंतर विरोधी पक्षनेते दरेकर यांनी आज तातडीने कंपनीला भेट दिली. तसेच बाधित कामगारांना दाखल करण्यात आलेल्या देशमुख नर्सिंग होम येथे जाऊन जखमींची विचारपुस केली व त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला. त्यानंतर दरेकर यांनी सांगितले की, कंपनीत वायुगळती झाल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. स्थानिक जनतेला या एमआयडीसीचा काहीच फायदा होत नाही. स्थानिक लोकांना सुरक्षित नोकऱ्याही मिळत नाहीत, कुठेतरी कंत्राटदरावर २ ते ३ हजारावर कामगार काम करत आहेत. या परिसरात राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना नेहमीच वायु प्रदुषण, जल प्रदुषणचा सामना करावा लागत आहे. अशा प्रकारची वायुगळती होऊन निष्पाप नागरिकांचे नाहक बळी जात आहेत. एम आय डी सी चा उपयोग हा फक्त बड्या कारखानदारांसाठी आहे की, स्थानिक राहिवाश्यांसाठी आहे, या एमआयडीसीचा फायदा नक्की कोणाला होत आहे याची सर्व माहिती माझ्याकडे असून या गोष्टींचा मी पर्दाफाश करणार असल्याचेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
आपण लवकरच यासंदर्भात राज्याचे कामगार आयुक्तांसमवेत बैठक आयोजित करणार आहोत. महाड एमआयडीसीमध्ये नेमकी किती केमिकल कारखाने आहेत. यामध्ये बॉयलर अटेंण्डट किती आहेत, त्यांना योग्य प्रशिक्षण दिले आहे का? या सर्वांचा आढावा घेणारी यंत्रणा एमआयडीसीमध्ये अस्तित्वात आहे का याचा सर्वंकष आढावा घेण्याबाबत कामगार आयुक्तांसोबत चर्चा करण्यात येईल असेही दरेकर यांनी सांगितले.
शरद पवारांची नेमकी इच्छा काय?
जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली आहे, यासंदर्भात शरद पवार यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर बोलतांना दरेकर म्हणाले, हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. या देशात लोकशाहीमध्ये कोणालाही मुख्यमंत्री होण्याचा व तशी इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण त्यासाठी पक्षीय बळ, पक्षप्रमुखांची मान्यता आणि पक्षाची इच्छा असावी लागते.
बहुतेक अजित पवार यांच्यावर तीर मारण्याचा प्रयत्न तर केला नाही ना ? असा सवाल दरेकर यांनी केला आहे. तसेच शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर दिलेली प्रतिक्रिया म्हणजे कदाचित अप्रत्यक्षरित्या अजित पवार यांना इशारा देण्यात आला आहे की, मुख्यमंत्रीपदाचे दावेदार फक्त तुम्हीच नाही, तर पक्षातील कोणीही नेता मुख्यमंत्री होऊ शकतो. जयंत पाटलांनी, भुजबळांनी इच्छा व्यक्त करायची आणि मुख्यमंत्री पदासाठी वाद होतोय असा प्रश्न उभारायचा, मग शरद पवारांच्या मनात राज्याच्या मुख्यमंत्री पदावर अजित दादा ऐवजी सुप्रिया सुळे यांना तर मुख्यमंत्री पदावर आणायचं आहे का? असा प्रश्नही जनसामान्यांच्या मनात उभा राहत आहे असेही दरेकर यांनी सांगितले.