महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे स्थापन झालेल्या ‘ईडी’ सरकारच्या वैधतेलाच शिवसेनेकडून सर्वेच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या तिढय़ासंदर्भात न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायमूर्तीच्या घटनापीठासमोर सर्वोच्च न्यायालयात मंगळवार 1 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
बंडखोर आमदारांची अपात्रता आणि सत्तासंघर्षावेळी निर्माण झालेल्या इतर कायदेशीर पेचांबाबत महत्त्वपूर्ण फैसला या सुनावणीदरम्यान होण्याची शक्यता आहे.
सर्वेच्च न्यायालयात महिन्याभरापूर्वी झालेल्या सुनावणीत खरी शिवसेना कुणाची, याबाबत निवडणूक आयोगापुढे सुरू असणारे प्रकरण पुढे चालू ठेवण्यास न्यायालयाने परवानगी दिली होती. दरम्यान, निवडणूक आयोगाने शिवसेना असे स्वतंत्र नाव वापरण्यास आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह वापरण्यास तात्पुरती मनाई करणारा आदेश दिला आहे. तसेच शिवसेना आणि शिंदे गटाला वेगळे पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह दिले आहे. हा मुद्याही सर्वेच न्यायालयात मंगळवारी होणाऱ्या सुनावणीत उपस्थित केला जाईल.