मुंबई- मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सोमवारी चर्चा केली. या चर्चेत नेमके कोणत्या विषयांवर बोलणे झाले याविषयी त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढण्यामागे बाहेरच्या राज्यातून येणारी लोकं जबाबदार आहेत. पश्चिम बंगाल वैगेरे इतर राज्यांमध्ये लाटा येत नाहीत असेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांची पाठराखण करत राज ठाकरे म्हणाले की, इतर राज्यांमध्ये रुग्ण मोजले नाहीत यामुळे तिथली परिस्थिती समोर येत नाहीय.
राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री आणि त्यांच्यातील चर्चेविषयी माहिती दिली. राज ठाकरे म्हणाले की, ‘काल मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन केला होता. लॉकडाऊनबाबत बोलण्यासाठी त्यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती. मात्र त्यांच्या आजूबाजूला कोविडचे रुग्ण असल्याने ते क्वॉरंटाईन आहेत. त्यामुळे त्यांची भेट घेता येऊ शकली नाही. म्हणून झूम अॅपवरून आम्ही चर्चा केली. त्यात कोविड आणि लॉकडाऊनबाबत चर्चा झाल्याचे ठाकरे म्हणाले.
परप्रांतीयांमुळे कोरोना वाढतोय – राज ठाकरे
बाहेरच्या राज्यातून येणारी माणसे आणि त्यांची न झालेली चाचणी यामुळे कोरोना महाराष्ट्रात वाढत आहे. तसेच इतर राज्यात कोरोना रुग्णांची चाचणीच केली जात नाही यामुळे आकडे समोर येत नाहीत. महाराष्ट्रात कोरोनाची टेस्टिंग केली जात आहे. त्यामुळे कोरोनाचे आकडे बाहेर येत आहेत. पुढे ते म्हणाले की, मागच्या वर्षी कोरोना सुरू झाल्यावर लोक आपापल्या राज्यात परतत होते. तेव्हाच मी म्हणालो होत की, ही लोक जेव्हा राज्यात परत येतील तेव्हा या लोकांची मोजणी करावी त्यांची चाचणी करावी. परंतु, त्याकडे लक्ष देण्यात आलेले नाही. कुणाचीही मोजणी आणि चाचणी केली नाही. त्यामुळे ही संख्या वाढत आहे. कोण येते कोण जाते हे कोणालाही कळत नाही. आज कोरोना आहे, उद्या दुसरे काही असेल. हे दुष्टचक्र न थांबणारे आहे.
10 वी अन् 12 वी च्या विद्यार्थ्यांना विनापरीक्षा पास करा
इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र आता सरकारने राज्यात कडक निर्बंध लावल्याने 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचे काय असा प्रश्न पालकांसह विद्यार्थ्यांनाही पडला आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना देखील परीक्षा न घेता पास करण्याचे राज्य सरकारला सुचवले आहे. यंदा 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. तसेच एप्रिल महिन्यात ऑफलाइन पद्धतीने परीक्षा देणाऱ्या 10 वी आणि 12 वीच्या सर्व विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण करावे अशी मागणी शिवसेनेकडून लोकसभेत करण्यात आली आहे. मात्र दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण वर्ष वाया गेले आहे. आता त्यांच्या परीक्षा होत आहेत. पण या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पास करायला हवे. कारण ते कोणत्या मानसिकतेत असतील हे सांगता येत नाही.
ते लहान असून त्यांच्या मानसिकतेचा विचार करावा. पहिल्यांदाच आपल्यावर हा प्रसंग ओढावला आहे. त्यामुळे मी राज्य सरकारला विनंती करत आहे की, खालच्या विद्यार्थ्यांना पास केले आहे. तसेच 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांनाही पुढे ढकलावे असे राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पश्चिम बंगाल वैगेरे इतर ठिकाणी काही लाटा नाही
राज ठाकरेंनी यावेळी इतर राज्यांमध्ये कोरोना रुग्ण का नाहीत याचे कारणही सांगितले आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्र औद्योगिक राज्य असल्याने बाहेरील येणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त आहे. पश्चिम बंगाल वैगेरे इतर ठिकाणी काही लाटा वैगेरे आल्याचे ऐकालया मिळालेले नाही. महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या वाढण्यामागे परप्रांतांमधून येणारी लोक आहेत. तसेच इतर राज्यांमध्ये कोरोना रुग्ण मोजले जात नाहीत. त्यामुळे तेथील आकडे वाढत नसल्याचे राज ठाकरे म्हणाले