मुंबई- आयकर विभागाने देशभरात 205 ठिकाणी आणि राजकीय पक्षांच्या कार्यालयावर छापे मारण्यात आले होते. याचा वापर करचोरीसाठी करण्यात येत होता. मुंबई आणि गुजरातमधील काही राजकीय पक्षांना मिळालेला निधी हा 2000 कोटींहून अधिक असू शकतो. अशी सूत्रांची माहिती आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अहमदाबादसह गुजरातमध्ये करचोरसाठी असे अनेक राजकीय पक्ष चालवले जात आहेत. गुजरातमध्ये 21 राजकीय पक्षांवर छापेमारी करण्यात आली होती. यासाठी मुंबईहून 120 आयकर अधिकाऱ्यांचे पथक गुजरातमध्ये पाठवण्यात आले होते.
गेल्या दोन दिवसांपासून आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. आज सकाळी मुंबईतील सायन आणि बोरिवली भागासह औरंगाबादेतही आयकर विभागाने छापेमारी केल्याची माहिती आहे. मुंबई झालेली छापेमारी ही झोपडपट्टी भागात करण्यात आली असून, त्या भागात एका राजकीय पक्षाचे कार्यालय आहे. हा राजकीय पक्ष नोंदणीकृत असला तरी निवडणूक आयोगाची मान्यता त्याला मिळालेली नाही. पक्षनिधीच्या नावाखाली करचोरी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, झोपडपट्टी परिसरात एका पक्षाचे 100 चौफूट नोंदणीकृत कार्यालय आहे. बँकेच्या रिकॉर्डनुसार, या पक्षाला गेल्या दोन वर्षात 100 कोटींची देणगी मिळाली होती. हा पक्ष नोंदणीकृत असला तरी त्याला मात्र निवडणूक आयोगाची अद्याप परवानगी नाही.असे सूत्रांचे म्हणणे आहे.
सूत्रधार अहमदाबादमध्ये
आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या पक्षाच्या अध्यक्षाला या व्यवहाराबाबत विचारणा केली. त्यावेळी त्याने आपण फक्त नावापुरतेच आणि ‘स्टेट्स’ साठी अध्यक्ष असल्याचे सांगितले. पक्ष निधी आणि इतर व्यवहार हे अहमदाबाद येथील ऑडिटरकडून केले जात असल्याची माहिती त्यांने दिली.
औरंगाबादेतही छापेमारी
सलग दुसऱ्या दिवशी औरंगाबादमध्ये आयकर विभागाने छापेमारी केली. शहरातील एका बड्या उद्योजकाचा घरावर ही छापेमारी करण्यात आली असून, सतीश व्यास असे त्यांचे नाव आहे. बुधवारी सकाळी 10 च्या सुमारास इन्कम टॅक्स विभागाने छापेमारी केली. सहकार नगर भागात 7 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. आयकर विभागाची मोठी टीम यामध्ये काम करत आहे. अद्याप नेमकी किती लाखांची रक्कम हाती लागली याबद्दल बोलण्यास कुणीही तयार नाही.असे सूत्रांकडून समजते .