परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यासाठी उमेदवार/परीक्षा कर्मचाऱ्यांचा सुरळीत प्रवास सुनिश्चित करण्याची केंद्रीय लोकसेवा आयोगाची राज्य सरकारांना विनंती
नवी दिल्ली, 5 जानेवारी 2022
कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा काळजीपूर्वक आढावा घेतल्यानंतर, नागरी सेवा (मुख्य) परीक्षा, 2021 नियोजित वेळापत्रकानुसारच म्हणजेच 7, 8, 9, 15 आणि 16 जानेवारी 2022 रोजी आयोजित करण्याचा निर्णय केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतला आहे.
आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून लागू निर्बंध/प्रतिबंध लक्षात घेऊन ,उमेदवार/परीक्षा कर्मचार्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी विशेषत: जे प्रतिबंधक / सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्रामधून येतात त्यांची प्रवासात कोणतीही गैरसोय होणार नाही ,आणि आवश्यक असल्यास, उमेदवारांचे ई-प्रवेशपत्र आणि परीक्षा कर्मचाऱ्यांची ओळखपत्रे प्रवासासाठी पास म्हणून वापरली जातील,हे सुनिश्चित करण्याची विनंती आयोगाने राज्य सरकारांना केली आहे.
उमेदवार/परीक्षा कर्मचाऱ्यांचा सुरळीत प्रवास सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने, परीक्षेच्या एक दिवस आधीपासून ते परीक्षा आयोजित केल्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजेच 06.01.2022 ते 09.01.2022 आणि 14.01.2022 ते 16.01.2022 पर्यंत सार्वजनिक वाहतूक पुरेशा स्तरावर कार्यान्वित करावी अशी विनंती राज्य सरकारांना करण्यात आली आहे.
महामारीच्या काळात परीक्षा आयोजित करण्यासाठी, सर्व सक्षम जिल्हाधिकारी आणि परिक्षा केंद्र पर्यवेक्षकांना आयोगाची मार्गदर्शक तत्त्वे प्रदान करण्यात आली आहेत.उमेदवार/परीक्षा कर्मचार्यांची वैयक्तिक स्वच्छता, सामाजिक अंतर राखणे आणि उमेदवार/परीक्षा कर्मचाऱ्यांनी पूर्ण वेळ मास्क परिधान करणे, परीक्षा स्थळी सोयीच्या ठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था करणे आणि परीक्षा कर्मचाऱ्यांनी, उमेदवारांनी स्वतःचे सॅनिटायझर पारदर्शक बाटल्यांमध्ये घेऊन जावे, प्रत्येक परीक्षा केंद्राची नियमितपणे स्वच्छता करणे, खोकला, शिंका येत असलेल्या, श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या, ताप येत असलेल्या उमेदवारांना बसण्यासाठी दोन अतिरिक्त परीक्षा खोल्या असाव्यात जेणेकरून ते योग्य सुरक्षा नियम इत्यादीनुसार परीक्षा देऊ शकतील.या सगळ्या गोष्टींचा प्रामुख्याने या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये समावेश आहे.