औरंगाबाद- येथील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाहत भाजपला आपला भावी मित्र असल्याचे म्हटले आहे.
तर दुसरीकडे, शिवसेना आणि भाजप एकत्र आल्यास राज्यातील मतदारांना आनंद होईल असे मत रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले आहे. या दोन्ही नेत्यांच्या विधानानंतर राज्यात राजकीय खळबळ उडाली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सगळे काही आलबेल आहे का? असा प्रश्नही सर्वसामान्यांना पडला आहे.
शिवसेना-भाजप 30 वर्षेसोबत
विशेष म्हणजे भाजप आणि शिवसेना राज्यात गेल्या 30 वर्षापासून सोबत होते. परंतु, 2019 मध्ये विधानसभा निवडणूक सोबत लढवल्यानंतर मुख्यमंत्री पदावरुन दोन्ही पक्षांमध्ये मतभेद झाले. त्यानंतर शिवसेनेने भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार बनवले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानानंतर शिवसेनेचे नेते आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढील तीन वर्षे मुख्यमंत्री राहिले तर आम्ही युतीसाठी तयार आहोत. जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर केंद्र आणि राज्य सरकारमध्ये चांगले समन्वय होईल. भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष हिंदुत्व विचारसरणीचे असल्याचे सत्तार म्हणाले.
राजकारणात काहीही होऊ शकते – फडणवीस
मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर टीप्पणी केली आहे. ते म्हणाले की, ‘त्यांच्या शुभेच्छा… एक चांगली गोष्ट आहे. कारण राजकारणात कधीही काहीही होऊ शकते. मात्र, सध्यातरी भाजपची भूमिका अगदी स्पष्ट आहे. आम्ही सत्तेकडे पाहत नसून आम्हाला एक सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावयाची आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
संजय राऊतांनी केले मोदींचे कौतुक
मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कौतूक केले असून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या उंचीचा दुसरा नेता भारतात नाही. अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर पंतप्रधान मोदींनी भाजपला वर आणण्याचे काम केले आहे. पूर्वी भाजप इतर पक्षांसोबत युती करून सरकार बनवत असे, परंतु, पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात भाजपला पूर्ण बहुमत मिळाले असे संजय राऊत यांनी सांगितले.
अजित पवार म्हणाले – मी कसे सांगू शकतो मुख्यमंत्र्यांची ‘मन की बात’
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीप्पणी केली आहे. ‘ते राज्याचे प्रमुख आहेत. त्यांच्या मनात काय चालले आहे? हे मी कसे सांगू? माझ्याशी बोलत असताना ते सरकारचे निर्णय, ते कसे चालवायचे, काय समस्या आहेत यावर चर्चा करतात असे अजित पवार म्हणाले.