नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर 2021
दक्षिण भारतातील राज्यांची प्राचीन संस्कृती, परंपरा आणि भाषा या भारताची संस्कृती आणि प्राचीन वारसा समृद्ध करतात, दक्षिण भारतातील राज्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाशिवाय भारताच्या विकासाची कल्पना करता येणार नाही असे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री श्री अमित शाह यांनी सांगितले.श्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज तिरुपती येथे दक्षिण विभागीय परिषदेची 29 वी बैठक झाली, या बैठकीत बोलताना श्री. शाह म्हणाले की, मोदी सरकार भारतातील सर्व प्रादेशिक भाषांचा आदर करते आणि म्हणूनच दक्षिण विभागीय परिषदेच्या आजच्या बैठकीत दक्षिण विभागीय परिषदेत समाविष्ट असलेल्या राज्यांच्या सर्व भाषांमध्ये भाषांतराची सुविधा देण्यात आली आहे. भविष्यात या परिषदेच्या प्रतिनिधींना त्यांच्या राज्याच्या भाषेत बोलताना पाहून आनंद होईल, अशी इच्छा गृहमंत्र्यांनी व्यक्त केली.कोविड-19 महामारीच्या काळात आपण आजपर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 111 कोटी मात्रा देण्यात यशस्वी झालो आहोत असे सांगत ही एक मोठी कामगिरी असून सहकारी संघराज्यवादाचे उदाहरण आहे, देशाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सहकारी आणि स्पर्धात्मक संघराज्यवादाचा लाभ घेणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ध्येय आहे, असे ते म्हणाले.जेव्हा महामारी सुरु झाली तेव्हा भारत या महामारीचा सामना करू शकणार नाही असे म्हटले जात होते मात्र पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने आपल्या पायाभूत सुविधा तसेच लसींचे देशांतर्गत उत्पादन वेगाने वाढवले,आज, आपण महामारी बाबतच्या भीतीवर मात केली आहे आणि केंद्र सरकार लसीकरण कार्यक्रमांतर्गत सर्व राज्यांमध्ये लसीकरण व्याप्ती वाढवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत राहील, असे श्री. शहा म्हणाले.श्री. शहा म्हणाले की, विभागीय परिषदा स्वाभाविकपणे सल्लागार संस्था आहेत आणि तरीही आम्ही अनेक समस्यांचे निराकरण करण्यात यशस्वी झालो आहोत, विभागीय परिषद उच्च स्तरीय सदस्यांमधील परस्पर संवादासाठी संधी प्रदान करते. गृहमंत्र्यांनी सांगितले की, गेल्या 7 वर्षात आम्ही विभागीय परिषदेच्या 18 बैठका घेतल्या, या तुलनेत पूर्वी फारच कमी बैठका होत होत्या,आता विविध विभागीय परिषदेच्या बैठका नियमितपणे बोलावल्या जातात आणि हे सर्व राज्य सरकारे तसेच केंद्रीय मंत्रालये आणि विभाग यांच्या सहकार्यानेच हे शक्य झाले आहे.