नवी दिल्ली, 9 जुलै 2021: टोकियो ऑलिंपिक स्पर्धा आता सुरू होणाच्या टप्प्यावर आहे. सर्वच खेळाडू आपापल्या परीने तयारीत गर्क आहेत. भारतीय खेळाडू देखील आता स्पर्धा सुरू होण्याची वाट पहात आहेत. यामध्ये नेमबाज संजीव राजपूत, बॉक्सर पूजा राणी, सिमरनजित कौर, चालण्याच्या शर्यतीमधील खेळाडू संदीप कुमार, टेबल टेनिसपटू शरथ कमाल आणि सुतिर्थ मुखर्जी हे सहा भारतीय खेळाडू देखिल याला अपवाद नाहीत. पुण्यातील लक्ष्य या स्वयंसेवी संस्थेने या सहा खेळाडूंना सहकार्य केले असून, हे सर्व खेळाडू ऑलिंपिकसाठी सज्ज झाले आहेत.
क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी 2009 मध्ये लक्ष्यही संस्था सुरू करण्यात आली. देशाचे नाव उज्वल करण्यासाठी एक पाऊल पुढे असणाऱ्या खेळाडूंच्या पाठिशी भक्कमपणे उभे रहायचे हे या संस्थेचे उद्दिष्ट असून,आतापर्यंत त्यांनी 80 खेळाडूंसाठी सहकार्याचा हात पुढे केले आहे. विविध क्रीडा प्रकारातील गुणवान खेळाडूंना त्यांच्या उद्दिष्टापर्यंत नेण्यासाठी ही संस्था नेहमीच त्यांच्या पाठिशी उभी राहिली आहे.
आपल्या देशाला क्रीडा क्षेत्रातील एक ताकद देश म्हणून नावारुपाला आणण्यासाठी असणाऱ्या मोहिमेत हा आमचा खारीचा वाटा आहे. खेळाडूंना पायाभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी आमची संस्था खेळाडूंना मदत करते. त्यामुळे त्यांना आपल्या खेळाकडे लक्ष केंद्रित करता येते. आमचे हे सहा खेळाडू देखिल ऑलिंपिकमध्ये चांगली कामगिरी करतील असा आम्हाला विश्वास आहे. यातील पूजा राणी आणि सिमरनजित कौर या दोन खेळाडूंसोबत तर आम्ही गेली खूप वर्षे बरोबर आहोत. टेकियो ऑलिंपिकमध्ये या खेळाडूंनी पदकापर्यंत पोहचावे हीच आमची अपेक्षा आहे आणि त्यासाठी त्यांना शक्य तेवढी मदत करण्यासाठी आम्ही बांधील आहोत, असे लक्ष्यचे अध्यक्ष विशाल चोरडिया यांनी सांगितले.
लक्ष्यकडून मिळत असलेल्या सहकार्याबाबत 2018 राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता नेमबाज संजीव राजपूत म्हणाला की, ऑलिंपिकसारख्या मोठ्या स्पर्धेच्या तयारसाठी लक्ष्यसारखी एखादी संस्था उभी राहिली हे खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यांच्या सहकार्याने देशाची मान उंचावण्यासाठी मी सज्ज आहे. देशासाठी पदक मिळविण्यासाठी आम्हाला अथक प्रयत्न करावे लागतात. सरावाबरोबर येणाऱ्या बाह्य व्यवस्थापानाकडेही आम्हाला बघावे लागते. पण, लक्ष्यसारख्या संस्थेचे सहकार्य लाभत असल्यामुळे आम्हाला या गोष्टींकडे बघावेही लागत नाही. आम्ही खेळावर लक्ष केंद्रित करू शकतो.
आपल्या मिशन ऑलिंपिक या उपक्रमाद्वारे लक्ष्यने ऍथलीट्सना आवश्यकता असलेल्या आहार तज्ञ, मानसोपचार तज्ञ आणि फिजिओथेरपीस्ट या विविध क्षेत्रातील तज्ञांना सरावासाठी उपकरणे, तसेच प्रवासासाठी सुविधा अशा जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. एकूण 6 ऍथलिट्सपैकी पूजा राणी आणि सिमरनजीत कौर या दोघी अनेक वर्षांपासून लक्ष्यशी संलग्न आहेत. पूजा राणीच्या गुणवत्तेवर भरवसा ठेऊन लक्ष्यने तिला गेल्या दशकभरापासून पाठिंबा दिला असून याकालावधीत दुखापतीमुळे सुमारे वर्षभर खेळापासून दूर राहण्यापासून आशियाई स्पर्धेत दोनसुवर्णपदके मिळविण्यापर्यंतच्या तिच्या प्रवासाचा समावेश आहे. त्याउलट लक्ष्यने सिमरनजीतला तिच्या प्राथमिक काळापासून पाठिंबा देताना तिच्या गुणवत्तेवर आणि कामगिरीवर लक्ष दिले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलेल्या पूजा राणीने लक्ष्य सोबतच्या आपल्या प्रवासा विषयी बोलताना सांगितले की, अगदी सुरुवातीपासून म्हणजे 2012 पासून लक्ष्यचा संपूर्ण पाठिंबा मिळाल्यामुळे मी नशीबवानच ठरले आहे. माझा क्रीडा क्षेत्रातील प्रवास हा यश आणि काही वेळेला दुर्दैवाचा फटका असा संमिश्र राहिला आहे. परंतु लक्ष्यने सातत्याने दिलेल्या पाठिंब्यामुळे मला ही वाटचाल चालू ठेवतानाच खडतर परिश्रम करून देशासाठी पदके जिंकण्याची प्रेरणा मिळाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके जिंकणे ही अतिशय अवघड गोष्ट असते त्यासाठी प्रचंड परिश्रमाची गरज असते. परंतु लक्ष्यने दिलेल्या पाठिंब्यामुळे हा प्रवास खूपच सुसह्य आणि अनेक गोड फळे देणारा ठरला. अगदी लॉकडाऊनच्या काळात सुद्धा लक्ष्यने पुरविलेल्या तज्ञांपैकी मानसोपचार तज्ञासोबत तसेच फिजिओथेरपीस्टच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत राहिल्यामुळे दडपण कमी होण्यास व माझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यास खूपच मदत झाली.
लक्ष्यने या दोघींबरोबरच चालण्याच्या शर्यतीतील ऍथलिट्स संदीप कुमारलाही पाठिंबा दिला असून त्याने नुकताच राष्ट्रीय विक्रम मोडण्याबरोबरच टोकियो ऑलिंपिक मधील आपले स्थान निश्चित केले असून ही त्याची दुसरी ऑलिंपिक स्पर्धा ठरणार आहे. याबरोबरच टेबल टेनिसपटू सुतीर्था हिला सुद्धा लक्ष्यने पाठिंबा दिला असून गेल्या काही वर्षात आपल्या कामगिरीत वेगाने सुधारणा करणाऱ्या सुतीर्थाची टिकियो ऑलिंपिक ही पहिलीच स्पर्धा ठरणार आहे.