पंढरपूर – ‘पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी’ अशी महती असलेलली पंढरी आज सुनी सुनी दिसत होती. राज्यातील सकल संतांच्या पादुका पंढरीत वारीसाठी आल्या, पण त्यांच्यासमवेत दरवर्षी असलेला भक्तांचा प्रवाह नसल्यामुळे चंद्रभागेला जणू भाविकांची ओहोटी आल्यासारखे वाटत होते.दशमीला दरवर्षी अनेक संतांच्या समवेत सुमारे दहा लाख भाविक पंढरीत येतात. यंदा कोरोनामुळे ठराविक वाहनांमधून हरिनामाचा गजर करीत मोजके वारकरी आल्याने पंढरीचे रूपच पालटले. पंढरी सुनीसुनी होती. चंद्रभागेचा तीर रिकामा होता. पंढरपूरमध्ये संचारबंदी लागू केल्याने रस्ते ओस पडले होते. जेथे या दिवशी रस्त्यावर चालणे शक्य नसते, तेथे शांतता होती.
आषाढी वारीसाठी प्रमुख सात संतांच्या पादुका मोजक्या वारकऱ्यांसमवेत मंगळवारी रात्री उशिरा दाखल झाल्या. मात्र लाखो वारकऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे पंढरीला भक्तिरंग आला नाही. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य सरकारने पायी वारी रद्द करण्याचा निर्णय घेतला; तसेच संतांच्या पादुका थेट पंढरीला नेण्याची जबाबदारी घेतली. त्यानुसार, संतांच्या पादुकांसाठी एसटी बस देण्यात आल्या.