बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातील (ता. हुक्केरी) छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगाव जिल्हा प्रशासनाने रात्रीत हटवला. या घटनेचे तीव्र पडसाद शनिवारी सीमाभागा सह कोल्हापूर जिल्ह्यात उमटले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात कर्नाटक सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील विविध संस्था संघटनांनी पुतळा त्वरीत बसवावा अन्यथा बेळगावात जाऊन आंदोलन करु असा इशारा दिला आहे. दरम्यान शुक्रवारी रात्री दोन गटांनी या भागाचे आमदार सतीश जारकीहोळी यांची भेट घेतली. यावेळी आमदारांनी सांगितले की माझ्या हस्ते शिवपुतळा चबुतऱ्याचे पूजन होऊन या ठिकाणी पुतळा बसविण्याचा निर्णय झाला आहे. परंतु तुम्ही रातोरात पुतळा बसवण्याची घाई का केली? याला कायदेशीर परवानगी घेऊन तेथे पुतळा बसवूया, तोपर्यंत हा पुतळा हलवून सुरक्षित जागी ठेवा. पंधरा दिवसानंतर याबाबत मी निर्णय घेतो असे आश्वासन आमदारांनी दिल्याचे पंच व पुतळा कमिटीचे म्हणणे आहे.आमदारांच्या आश्वासनानंतर गावातील पंच मंडळी व पुतळा कमिटीच्या सदस्यांनी शनिवारी मध्यरात्री पुतळा सुरक्षित ठिकाणी ठेवल्याचे बोलले जात आहे. शनिवारी मध्यरात्री २ वाजता हुक्केरीचे तहसीलदार अशोक गुराणी व पोलिस निरीक्षक गुरुराज कल्याण शेट्टी देखील उपस्थित होते. याबाबत कोणावरही अन्याय होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता पुतळा बसविण्यास परवानगी दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. स्थानिक ग्रामपंचायतीची त्यास परवानगी असतानाही कर्नाटक सरकारने पुतळा हटवला आहे. सरकारच्या आदेशानंतर रातोरात पोलिस बंदोबस्तात पुतळा हटवण्यात आला आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कर्नाटक सरकारला वावडे का?, असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शिवभक्त रविवारी (9 ऑगस्ट) कर्नाटकात जाऊन आंदोलन करणार आहेत.महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी यांना निवेदन हुक्केरी तालुक्यातील मनगुत्ती येथे प्रतिष्ठापित छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कर्नाटक प्रशासनाने काही मोजक्या संघटना आणि लोकांच्या दबावाखाली येत रातोरात हटवली आहे, त्याचा तीव्र शब्दात निषेध. मागील काही दिवसांपासून कर्नाटकात सोशल मीडियावर अवमानकारक लिखाण, पुस्तकातून महाराजांचा इतिहास काढून टाकणें, आणि मूर्ती हटवणे असे अवमानकारक प्रकार वाढत आहेत, प्रशासनाने हे प्रकार वेळीच थांबवावेत, छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड भारताचे आराध्य दैवत आहेत आणि त्यांच्याबाबत झालेला अवमान शिवभक्त सहन करू शकत नाहीत. याचसाठी येत्या सोमवार दिनांक 10 ऑगस्टला महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.