मुंबई- शिवसेना आणि वंचित बहूजन आघाडीच्या युतीची घोषणा उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे राज्यात पुन्हा शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली आहे.मुंबईतील आंबेडकर भवनात प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, सुभाष देसाईसह आदी नेते पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकार आणि भाजपवर घणाघाती हल्ले केले. उद्धव ठाकरे म्हणाले, देशहिताच्या नावाखाली सध्या अनेक भ्रम पसरवले जात आहे. देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. हुकूमशाहीविरोधात आम्ही एकत्र आलो आहोत. सध्या देशात प्रचंड वैचारिक प्रदूषण सुरू आहे. हे वैचारिक प्रदूषण दूर करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. त्यामुळे सर्वांनाच पुन्हा मोकळा श्वास घेता येईल.
तर, प्रकाश आंबेडकर यांनीही एक दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचाही अंत होईल, असे म्हटले आहे.युतीची घोषणा करताना उद्धव ठाकरे म्हणाले, आज एका स्वप्नाची पूर्ती झाली आहे. महाराष्ट्रातील जनता या युतीची आतुरतेने वाट पाहत होते. प्रकाश आंबेडकर यांचे आजोबा आणि माझे वडील या दोघांनीही समाजातील वाईट चालीरितींवर घणाघाती प्रहार केले. आतादेखील राजकारणात काही वाईट चालीरीती शिरल्या आहेत. त्यांचा नायनाट करण्यासाठी या दोन्ही पिढ्यांचे वारसरार एकत्र आले आहेत.