नवी दिल्ली -देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं ९ ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार केले गेले, पण त्यांची प्रकृती खालावतच गेली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्लीमध्ये २८ डिसेंबर १९५२ रोजी झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ’ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३ मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते.
अरुण जेटली यांना सॉफ्ट टिश्यू कँसर हा दुर्मीळ आजार झाला होता. या आजारावरील उपचारासाठी ते १३ जानेवारी रोजी अमेरिकेत गेले होते. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात ते भारतात परत आले होते. दरम्यान, जेटलींच्या अनुपस्थितीत पियूष गोयल यांनी अंतरिम अर्थसंकल्प मांडला होता. त्यानंतर अरुण जेटली यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात जेटली यांनी प्रकृती अस्वस्थ्यामुळे मंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला होता.
२०१४ मध्ये केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर जेटलींकडे वित्त आणि संरक्षण मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला होता. पुढे मनोहर पर्रिकर यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर जेटलींकडील संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी पर्रिकर यांच्याकडे सोपवली गेली. मात्र पर्रीकर हे गोव्यात परतल्यावर पुन्हा एकदा जेटलींकडे संरक्षक मंत्रिपदाचा कार्यभार सोपवला गेला होता. पुढे निर्मला सीतारामन यांच्याकडे संरक्षण मंत्रिपद येईपर्यंत जेटलींनी संरक्षण मंत्रालय सांभाळले होते.
अरुण जेटली यांचा अल्पपरिचय.
जन्म. २८ डिसेंबर १९५२ नवी दिल्ली येथे.
अरुण जेटली हे भारतीय जनता पक्षाचा एक महत्त्वाचा नेता म्हणून ओळखले जात असत. ते आधी पेशाने वकील, पण त्यानंतर ते पूर्ण वेळ राजकारणात उरतले. अरुण जेटली यांचे वडिल किशन जेटली हे प्रख्यात वकील होते. दिल्लीतील सेंट झेव्हियर्स शाळेतून त्यांनी आपले शालेय शिक्षण घेतले आणि पदवीचे शिक्षण त्यांनी श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून घेतले. त्यानंतर १९७७ ला त्यांनी विधीची पदवी घेतली. आपल्या महाविद्यालयीन जीवनात अरुण जेटली हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते होते. १९७४ मध्ये ते दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाचे अध्यक्ष बनले. अरुण जेटली यांच्या राजकीय कारकीर्दीला महाविद्यालयापासूनच सुरुवात झाली. अरुण जेटली हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते होते. सुरुवातीच्या काळापासूनच वक्तृत्व आणि वादविवादावर त्यांचे प्रभुत्व होते. दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाचे ते अध्यक्ष बनले आणि त्यांचा राजकारणाचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. आणीबाणीच्या काळात अरुण जेटली यांना अटक करण्यात आली होती. जेटली यांना अंबाला येथील तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्यानंतर तेथून हलवून तिहारच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. आणीबाणीनंतर ते पुन्हा राजकारणात जोमाने काम करू लागले. त्यांची १९७७ मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.
अरुण जेटली हे एक यशस्वी वकील म्हणून ओळखले जाता असत. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात ते काम पाहात असत. १९९० मध्ये ते दिल्ली उच्च न्यायालयाचे वरिष्ठ विधीज्ञ म्हणून निवडले गेले होते. कायद्याच्या क्षेत्रातील त्यांचे ज्ञान आणि अनुभव पाहून १९९८ ला त्यांची निवड संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेला जाणाऱ्या शिष्टमंडळात झाली होती. १३ ऑक्टोबर १९९९ रोजी त्यांची नियुक्ती अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात करण्यात आली होती. त्यांच्याकडे तंत्रज्ञान आणि प्रसारण या मंत्रालयाचा पदभार सोपवण्यात आले. २००९ ते २०१४ या काळात त्यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून काम केले. मे २०१४ पासून ते नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून काम बघत होते. देशात आर्थिक सुधारणा होणे हे महत्त्वाचे आहे अशी भूमिका ते मांडतात. अल्पकाळासाठी त्यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाची देखील जबाबदारी होती. आजवर अरुण जेटली यांनी आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, त्यानंतर राज्यसभेवर खासदार, तिथं भूषविलं विरोधी पक्षनेतेपदही होते.
२०१९ च्या निवडणुकी मध्ये त्यांनी आपल्या आजारपणा मुळे त्यांनी माघार घेतली. लोकसभेची निवडणूक मात्र एकदाच लढवली; त्यात त्यांना अपयश आलं. ग्लॅमर आणि ड्रेस सेन्सच्या बाबतीत अरुण जेटली सर्वापेक्षा वेगळे होते. चष्म्याच्या फ्रेमपासून चप्पल, बुटापर्यंत सर्वामधून उमदेपणा झळकत असे. त्यांच्या वार्डरोबमध्ये जगभरातील ब्रँडचे कपडे उपलब्ध असत.
२४ मे १९८२ रोजी त्यांचा विवाह संगीता डोग्रा यांच्याशी झाला. संगीता डोग्रा जम्मू-काश्मीरचे कॉंग्रेसी नेता व उपमुख्यमंत्री राहिलेल्या गिरीधारीलाल डोग्रा यांच्या कन्या.
त्यांचा जन्म मात्र अमृतसरचा.संगीता डोग्रा यांनी जम्मू विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात एम.ए केलं आणि त्यानंतर १९८२ मध्ये जेटलींकडून लग्नाची मागणी आली. त्या वेळी अरुण जेटली नामवंत वकील होण्याबरोबरच भाजपमध्येही स्थिरावले होते. त्यांच्या लग्नाला अर्थातच दोन्ही पक्षांचे नामवंत होते. त्यात पंतप्रधान इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवानी ही बडी मंडळी होती. लग्नानंतर संगीता यांचं नाव बदललं गेलं, त्या झाल्या डॉली. आणि अर्थातच हळूहळू त्या भाजपच्या कार्यकर्त्याही बनल्या. घरातून बालपणापासूनच राजकारणाचं बाळकडू मिळालेल्या संगीता उर्फ “डॉली‘ या अरुण जेटली यांच्या निवडणुकीचे सारं व्यवस्थापन स्वत: पाहात असत. त्यांना रोहन आणि सोनाली अशी दोन मुले आहेत.