5 ऑगस्टपासून कोरोनाशी झुंज देत असलेले प्रसिद्ध पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांचे शुक्रवारी निधन झाले आहे. बालासुब्रमण्यम यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर चेन्नईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून होते. मात्र, गेल्या 24 तासांत त्यांची प्रकृती नाजूक झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून परिपत्रकाद्वारे देण्यात आली.
एसपी यांना प्रेमाने ‘बालू’ म्हटले जाते. ज्यांच्या आवाजात अशी जादू आहे की, प्रत्येकजण त्यांच्या प्रेमात पडतो. मोहम्मद रफी, किशोर कुमार यांच्यासारख्या दिग्गजांमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या या गायकाचा आवाज इतरांपेक्षा अगदी वेगळा आहेे. बाला हे बॉलिवूडमध्ये सलमान खानचा आवाज म्हणून ओळखले जातात. सुमारे दशकभर त्यांनी सलमानसाठी एकाहून एक गाणी गायली. मैनें प्यार किया या चित्रपटातील दिल दिवाना या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअरचा बेस्ट मेल प्लेबॅक सिंगरचा अवॉर्ड मिळाला होता.
एक नजर टाकुयात, बाला यांच्या खासगी आयुष्यावर
एस. पी. बालासुब्रमण्यम यांचा जन्म 4 जून 1946 रोजी आंध्र प्रदेश येथील नल्लोर जिल्ह्यात झाला. त्यांचे वडील रंगमंचाशी जोडलेले होते. त्यांनी वडील एस. पी. सम्बामूर्तींंकडूनच कलेसंबंधी माहिती समजून घेतली आणि नंतर त्यांचा कल संगीताकडे गेला. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असतानाही ते संगीत शिकत होते. त्यांनी पहिल्यांदा तेलुगू कल्चर संस्थेतील संगीत स्पर्धेत बक्षीस मिळवले होते. 1966 मध्ये त्यांना ‘श्री श्री श्री मर्यादा रमन्ना’ या चित्रपटात गाण्यासाठी पहिली संधी मिळाली. या गाण्याच्या फक्त आठ दिवसांनंतरच बालासुब्रमण्यम यांना तेलुगू चित्रपटाव्यतिरिक्त इतर गाणी गाण्याची संधीही मिळाली. यानंतर ते तामिळ आणि तेलगू चित्रपटासाठीच गात राहिले. त्यांनी पहिल्यांदा ‘एक-दूजे के लिए’ या हिंदी चित्रपटासाठी गाणी गायली. या चित्रपटातील सर्वच गाणी सुपरहिट झालीत आणि बॉलिवूडला एकदम युनिक आवाजाचा गायक मिळाला. ‘एक दूजे के लिए’ चित्रपटाला फिल्म फेअर पुरस्काराचे 13 कॅटेगिरीसाठी नामांकन मिळाले होते. यातील तीन कॅटेगिरीमध्ये उत्कृष्ट एडिटिंग, उत्कृष्ट गीत आणि उत्कृष्ट स्क्रीनप्लेसाठी पुरस्कार मिळाले. बालासुब्रमण्यम यांना ‘तेरे मेरे बीच’गाण्यासाठी नामांकन मिळाले होते, परंतु त्यांना पुरस्कार मिळाला नाही. मात्र, याच चित्रपटासाठी उत्कृष्ट गायकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार त्यांना मिळाला.
सलमान खानच्या करिअरच्या सुरुवातीला बालासुब्रमण्यम यांनी त्याला आवाज दिला होता. ‘मैंने प्यार किया’ सारखे चित्रपटातील -‘आते जाते’, ‘कबूतर जा जा’, ‘आजा शाम होने आई’, ‘मेरे रंग में रंगने वाली’ आणि टायटल साँग (मैंने प्यार किया) मध्ये बालासुब्रमण्यम यांनी आपल्या आवाजाची जादू पसरवली. त्यावेळी सलमानसारख्या नवीन अभिनेत्याला बालासुब्रमण्यम यांनी आपला आवाज देणे मोठी गोष्ट होती. या चित्रपटातील ‘दिल दीवाना बिन सजना के माने ना’या गाण्यासाठी त्यांना बेस्ट प्लेबॅक गायकाचा पुरस्कार मिळाला. याशिवाय त्यांना लता मंगेशकर यांच्यासोबत गायलेले गाणे ‘दीदी तेरा देवर दीवाना’साठी फिल्मफेअरचा विशेष पुरस्कारदेखील मिळाला.
- जावेद अख्तर यांच्या मनात होता संशय
जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, ज्यावेळी सर्वत्र किशोर कुमार आणि मोहम्मद रफी यांचाच बोलबाला होता, त्यावेळी त्यांच्यासमोर एस. पी. बालासुब्रमण्यम हा एकच गायक मजबुतीने उभा राहू शकत हाेता. हा किस्सा ‘सागर’ चित्रपटाशी संबंधित आहे. या चित्रपटातील गाणी जावेद साहेबांनी लिहिली होती. यात एक ‘यूं ही गाते रहो, यूं ही मुस्कुराते रहो’ हे मस्तीखोर गाणे रेकाॅर्ड होणार होते. हे गाणे ऋषी कपूर आणि कमल हसनवर चित्रीत केले जाणार होते. हे गाणे मस्तीचे असल्यामुळे दुसरा गायकही किशोर कुमार यांच्या स्टाइलने गाणारा पाहिजे होता. आर. डी. बर्मन आणि जावेद यांनी हे गाणे बालासुब्रमण्यम यांच्याकडून गाऊन घेण्याचा विचार केला. या गाण्यामध्ये बालासुब्रमण्यम, किशोर दा यांना टक्कर देऊ शकतील की नाही याचा दोघांनाही संशय होता. मात्र, ज्यावेळी गाणे रेकॉर्ड झाले तेव्हा बालासुब्रमण्यम यांनी सिद्ध केले की, ते तामिळ आणि तेलुगूमध्येच नव्हे तर हिंदीतदेखील खूप उत्कृष्ट गाणी गाऊ शकतात.
- लागोपाठ 12 तासांत 21 गाणी केली रेकॉर्ड
एस. पी. बालासुब्रमण्यम यांनी 8 फेब्रुवारी 1981 रोजी एक अप्रतिम रेकॉर्ड बनवला आहे. त्यांनी सकाळी 9 वाजेपासून ते रात्री 9 वाजेपर्यंत कन्नडमध्ये 21 गाणी रेकॉर्ड केली. त्यांनी एका दिवसात तामिळमध्ये 19 आणि हिंदीमध्ये 16 गाणी रेकॉर्ड केली आहेत. एक काळ असा होता की, एका दिवशी ते 15-16 गाणी रेकॉर्ड करणे ही त्यांची दिनचर्या झाली होती. याच काळात बालासुब्रमण्यम हिंदी चित्रपटातील आपल्या गाण्यांबाबत खूप गंभीर झाले. त्यांना एखादे गाणे कठीण वाटायचे त्यावेळी ते तयार करण्यासाठी 8-10 दिवसांचा कालावधी घेत असत. जर निर्मात्यांनी घाई केली तर ते गाण्यासाठी नकार देत असत.