बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) माजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांची विश्वासू अर्पिता मुखर्जी हिच्या आणखी एका फ्लॅटवर धाड टाकली आहे. ईडीने यावेळी कोलकाता विमानतळाजवळील चिनार पार्कमध्ये छापेमारी केली आहे. या छाप्यात कोणता मुद्देमाल जप्त करण्यात आला हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
ईडीने बुधवारी अर्पिता मुखर्जींच्या फ्लॅटवर छापा टाकला होता. गुरुवारपर्यंत सलग 18 तास चाललेल्या या छाप्यात अर्पिताच्या घरातून 27.9 कोटी रुपयांची रोकड व 5 किलो सोने जप्त करण्यात आले होते. हे पैसे पार्थ चॅटर्जींचे असल्याचा दावा अर्पिताने केला होता. ‘पार्थ चॅटर्जी या घराचा वापर पैसे ठेवण्यासाठी करत होते. त्यांनी या ठिकाणी एवढे मोठे पैसे ठेवले असतील याचा मला अंदाज नव्हता,’ असे त्या म्हणाल्या.
तत्पूर्वी, गत शनिवारी झालेल्या छापेमारीत अर्पिताच्या घरातून 21 कोटींची रकम व 1 कोटींची ज्वेलरी जप्त करण्यात आली होती. म्हणजे आतापर्यंत तिच्या घरातून 50 कोटींहून अधिकची रोकड व ज्वेलरी जप्त करण्यात आली आहे.
चॅटर्जींची मंत्रीपदासह TMC तून हकालपट्टी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी गुरूवारी शिक्षक घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पार्थ चॅटर्जी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. अंमलबजावणी संचालनालयाने बुधवारपासून गुरूवारपर्यंत चाललेल्या 18 तासांच्या छाप्यात चॅटर्जींच्या विश्वासू अर्पिता मुखर्जीच्या दुसऱ्या घरातून 27.9 कोटी रुपयांची रोकड व गोल्ड जप्त केले होते.
या कॅशविषयी ईडीने त्यांना छेडले असता तिने हा पैसा पार्थ चॅटर्जी यांचा असल्याचे स्पष्ट केले. त्या म्हणाल्या -‘चॅटर्जी या घराचा वापर पैसा ठेवण्यासाठी करत होते. त्यांनी एवढी मोठी रकम ठेवली असेल याचा मला अंदाज नव्हता.’
अर्पिताच्या घरी कोट्यवधींचे घबाड आढळल्यानंतर चॅटर्जी यांची टीएमसीतून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता ममतांनी त्यांची कॅबिनेटमधून हकालपट्टी केली आहे.
ममता सरकारमध्ये क्रमांक-2 चे मंत्री होते चॅटर्जी
ममता सरकारमध्ये पार्थ चॅटर्जी सर्वात ज्येष्ठ मंत्री होते. ते दक्षिण 24 परगणाच्या बेहला पश्चिम मतदार संघातून 5 वेळा विधानसभेवर पोहोचले होते. चॅटर्जी 2011 पासून आतापर्यंत सलग मंत्रीपदी होते. तत्पूर्वी 2006 ते 2011 पर्यंत ते बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते. पार्थ यांच्याकडे सध्या उद्योग, वाणिज्य व संसदीय कामकाज सारख्या महत्वाच्या मंत्रालयाचा पदभार होता. त्यांची आता टीएमसीतूनही हकालपट्टी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी पार्थ चॅटर्जी यांची सर्वच पदांवरून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. ममता दिदींना माझी मागणी चुकीची वाटत असेल तर त्यांनी माझीही पक्षातून हकालपट्टी करावी, असे ते म्हणाले होते. घोष तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांचे विश्वासू मानले जातात.