अकोला-सावरकरांनी इंग्रजांना माफीचे पत्र लिहिले होते, यावर मी ठाम आहे, असे म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत सावरकरांचे माफीचे पत्रच माध्यमांसमोर दाखवले.तसेच, हे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सरसंघलाचक मोहन भागवत यांनाही दाखवा, असेही राहुल गांधी म्हणाले.भारत जोडो यात्रा या कारणावरून थांबवावी असे सरकारला वाटत असेल तर त्यांनी ती थांबविण्याचा प्रयत्न करावा असेही ते म्हणाले.
राहुल गांधी यांनी सांगितले की, पत्रात सावरकरांनी इंग्रजांना उद्देशून असे लिहिले आहे की, ‘सर मै आपका नौकर रहना चाहता हूँ’. या पत्राच्या खाली वीर सावरकर यांची स्वाक्षरीही आहे. ही स्वाक्षरी केल्यानंतर सावरकरांनी महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांनाही अशी सही करण्यास सांगितले होते. असे म्हणून सावरकरांनी सर्व देशासोबत तसेच तेव्हा स्वातंत्र्यलढ्यात असलेल्या काँग्रेसशी विश्वासघात केला होता.
भारत जोडो यात्रा रोखून दाखवा
स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात वक्तव्य केल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींसह ठाकरे गटावर टीका केली आहे. तर, मनसे प्रमुख राज ठाकरेंनी राहुल गांधींना काळे झेंडे दाखवण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. यावर राहुल गांधी म्हणाले, सरकारला भारत जोडो यात्रा रोखायची असेल तर रोखून दाखवावी. भारत जोडो यात्रेला सर्वसामान्यांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. विचारांशी लढाई विचारांनी लढली पाहिजे. कन्याकुमारीपासून सुरू झालेली ही यात्रा आता श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावूनच थांबेल, असा निर्धारही राहुल गांधींनी बोलून दाखवला.
विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न
राहुल गांधी यांनी सांगितले की, भारत जोडो यात्रेत शिवसेनेचेही खासदार, आमदार सहभागी झाले आहेत. यातील एका खासदाराने मला सांगितले की, शिवसेना फोडण्यासाठी एका आमदाराला 50 कोटी देण्यात आले. भाजप पैशांच्या, तपास यंत्रणांच्या जोरावर विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, देशात अजूनही चांगले लोक आहेत. जे विकाऊ होते ते विकले गेले, इतर चांगली लोक आमच्यासोबत येतील.
भाजप नेते शेतकऱ्यांवर बोलत नाही
राहुल गांधी म्हणाले, सध्या देशात अनेक प्रश्न आहेत. देशात महागाई आहे. तरुणांना रोजगार नाहीत. हाती उत्पन्न येत नसल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. शेतकरी वेळेत पीक विमा भरतात. मात्र, त्यांना पैसे मिळत नाही. त्यांचे कर्ज माफ होत नाही. ऐन संकटाच्या काळात त्यांना मदत मिळत नाही. मात्र, भाजपचे नेते शेतकऱ्यांवर काहीच बोलत नाही. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजप धार्मिक मुद्दे पुढे आणतो. जनतेच्या प्रश्नावर आम्हाला संसदेत बोलू दिले जात नाही. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी यात्रेशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे सर्वसामान्यही यात्रेत अपेक्षेने येत आहेत.
सर्वसामान्य प्रचंड अडचणीत
राहुल गांधी म्हणाले, सत्ताधारी पक्षाकडून केवळ तपास यंत्रणाच नव्हे तर न्याय व्यवस्थेवरही दबाब आणला जात आहे. या घटनात्मक समस्यांशिवाय देशात सर्वसामान्यही गंभीर समस्यांना सामोरे जात आहे. तरुणांना सध्या नोकरी मिळण्याची शाश्वती राहिली नाही. शिक्षणासाठी मोठा पैसा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे गोरगरीब चांगल्या शिक्षणापासून वंचित राहत आहेत. आरोग्याच्या सुविधेसाठी खर्च करावा लागत असल्याने सामान्य हवालदील झाले आहेत. तरी देशात सरकारी शाळा, सरकारी दवाखान्यांऐवजी खासगीकरणाला चालना दिली जात आहे. सर्व पैसे उद्योगपतींकडे कसे जातील, याकडेच सरकारचे अधिक लक्ष आहे. या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यासाठीच भारत जोडो यात्रा सुरू केल्याचे राहुल गांधी म्हणाले.