नवी दिल्ली – देशावर आर्थिक संकट पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांनीच आणले. आता त्यांना यातून कसे बाहेर पडावे ते सूचत नाही अशा शब्दांत राहुल गांधींनी सरकारवर निशाणा साधला. सोबतच, भारतीय रिझर्व्ह बँकेतून चोरी करून चालणार नाही असा टोला देखील माजी काँग्रेस अध्यक्षांनी लगावला आहे. आरबीआयने नुकतेच आपल्या राखीव (रिझर्व्ह) फंड्समधून 1 लाख 76 हजार कोटी रुपये सरकारला सुपूर्द केले. भारत सरकारला इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम देण्यास मंजुरी मिळाल्याचा हा एक विक्रमच आहे. त्यावरच प्रतिक्रिया देताना राहुल यांनी सरकारचा समाचार घेतला आहे.
राहुल यांनी ट्विट करून म्हटले, की “पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांना स्वतःच आणलेल्या आर्थिक संकटाची उकल काढता येत नाही. अशात आरबीआयमधून चोरी करून चालणार नाही. हे तर असेच झाले, की जणु गोळी लागली आणि जखम भरण्यासाठी एखाद्या डिस्पेंसरीतून बँडेज चोरली.” आरबीआयने विमल जालान समितीच्या शिफारसींवर अंमलबजावणी करत सोमवारी विक्रमी 1.76 लाख कोटी रुपयांचा आरक्षित / राखीव निधी सरकारला सुपूर्द केला आहे. यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला देशास आर्थिक संकटातून बाहेर काढण्यात मदत होईल असे सांगितले जात आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे, रिझर्व्ह बँकेचे रिझर्व्ह फंड सरकारला देण्यावर विचार करण्यासाठी समिती 2018 मध्ये स्थापित करण्यात आली होती. त्यानंतरच तत्कालीन आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी शक्तिकांत दास यांची नियुक्ती करण्यात आली आणि काही महिन्यांतच रिझर्व्ह फंड सरकारला ट्रांसफर करण्याचा निर्णय घेण्यात आला.