मुंबई: कॉंग्रेस नेते खा राहुल गांधी यांना धक्काबुक्कीचे महाराष्ट्रातही तीव्र पडसाद उमटले आहेत. या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ काँग्रेसने मुंबईसह राज्यात जोरदार निदर्शने केली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी या घटनेवर संताप व्यक्त करत ठिकठिकाणी टायर जाळून जाळत यूपी सरकारचा निषेध नोंदवला आहे.
राहुल गांधी यांना धक्काबुक्की झाल्याचं कळताच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने मंत्रालयाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याखाली निदर्शने केली. यावेळी केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, माजी मंत्री नसीम खान, मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, आमदार झिशान सिद्दीकी आदीं सहभागी झाले होते.
यावेळी बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकार बरखास्त करून उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. हाथरस येथील घटनेला योगी सरकारच जबाबदार आहे. त्यामुळे हे सरकार बरखास्त केलं पाहिजे, असं सांगतानाच अत्याचार पीडित मुलीचा अंत्यविधी झाला नाही, तर उत्तर प्रदेश सरकारने त्या मुलीला जाळले आहे, असा संताप बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. तर, उत्तर प्रदेशात जंगल राज सुरू असून हे गेल्या काही दिवसांपासूनच्या घटनांवरून सिद्ध होत आहे. त्यामुळे योगी सरकार विनाविलंब बरखास्त केलं पाहिजे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. राहुल गांधी यांनी कोणत्याही कायद्याचं उल्लंघन केलेलं नसताना त्यांना धक्काबुक्की होणं ही अत्यंत दुर्देवी घटना असल्याचंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.