पुणे : पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची आज बदली झाली आहे. दिल्लीला पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना तीन आठवड्याच्या आत पुणे जिल्ह्याधिकारी पदावरुन कार्यमुक्त करण्यास सांगण्यात आले आहे.
भारतीय प्रशासकीय सेवेतील 2008 या बॅचचे नवल किशोर राम हे (आयएएस) अधिकारी आहेत. 2 वर्षांपूर्वी त्यांची पुणे जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झाली होती. त्यांच्या बदलीनंतर आता पुण्याचे पुढील जिल्हाधिकारी कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
फेम इंडिया एशिया पोस्ट ने केलेल्या सर्वेक्षणानुसार नवल किशोर राम यांचा देशातील पन्नास लोकप्रिय जिल्हाधिकार्यांनी मध्ये समावेश होता. नवल किशोर राम मूळचे बिहार मधील असून 2007 मध्ये ते भारतीय शासकीय सेवेत दाखल झाले होते. आयएएस बनल्यानंतर त्यांचं पहिलं पोस्टिंग नांदेड मध्ये झालं होतं. त्यानंतर त्यांनी यवतमाळ जिल्हा परिषदेत सी इ ओ आणि त्यांनतर बीड आणि औरंगाबाद जिल्हाधिकारी म्हणून काम केलं. औरंगाबाद मधील कचऱ्याच्या प्रश्नाच्या निमित्ताने ते प्रकाशझोतात आले होते. दोन वर्षांपूर्वी यांची पुणे जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली. पुण्यात आल्यानंतर कोरेगाव भीमा रणस स्तंभ अभिवादन दिनाच्या कार्यक्रमाचं नेटकेपणानं नियोजन त्यांनी केलं. वर्षभरापूर्वी झालेल्या दंगलीमुळे कोरेगाव भीमा हा संवेदनशील विषय बनला होता. नवलकिशोर राम यांनी तो इतक्यात संवेदनशीलतेने हाताळला.
पुण्यामध्ये गेल्यावर्षी आलेला महापूर तसेच पावसाळ्यातील दुर्घटनांचा वेळी नवलकिशोर राम यांची कार्यक्षमता दिसून आली. सध्या कोरोनाच संकट असताना परिस्थिती हाताळत असताना जिल्हाधिकारी म्हणून नवलकिशोर राम हे राबवत असलेल्या उपायोजना प्रभावी ठरताहेत. त्यामुळे त्यांचं कौतुक होत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर नवलकिशोर यांची पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी पुण्यामध्ये अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले आय ए एस अधिकारी श्रीकर परदेशी यांना पंतप्रधान कार्यालयात काम करण्यासाठी खास बोलावून घेण्यात आलं होतं.